पीकविमा योजनेला मुदतवाढ द्या ; राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई | प्रतिनिधी |
पीकविमा योजनेला 23 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या; ठाकरे सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत सन 2021-22 या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची गुरुवारी शेवटची मुदत होती. राज्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची दि.15 जुलै शेवटची मुदत असून, आतापर्यंत सुमारे 46 लाख शेतकर्‍यांनी अर्ज केले आहेत, असं कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र, राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकर्‍यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने 23 जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.

Exit mobile version