। मुंबई । प्रतिनिधी ।
अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेरीनंतर राबविण्यात येत असलेल्या ओपन टू ऑल या फेरींतर्गत 8 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास अंतिम मुदत होती. मात्र, राज्य सरकारने नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनाची सुट्टी जाहीर केल्याने या फेरीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून 8 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली होती. या फेरीसाठी प्राधन्यक्रम अंतिम केलेल्या 3 लाख 81 हजार 420 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 48 हजार 784 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधन्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जागा उपलब्ध केल्या आहेत. 8 ऑगस्टपर्यंत या फेरीअंतर्गत 3 लाख 15 हजार 311 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यातील नियमित फेरीमध्ये 3 लाख 10 हजार 708 इतके प्रवेश झाले आहेत. तसेच कोटामध्ये 4 लाख 603 इतके प्रवेश झाले आहेत.
मात्र 8 ऑगस्ट रोजी मुंबई विभागात नारळी पोर्णिमेनिमित्त सुट्टी असल्याने, तसेच 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 11 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 पर्यंत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.







