। धाटाव । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील डोंगरावर धनगर समाजाची 48 घरे आहेत. येथील डोंगराला लागलेल्या वणव्यात ही सर्व घरे जळून खाक झाली आहेत. या घरांचा तात्काळ फेर पंचनामा करून बेघर कुटूंबाना मदत मिळावी, यासाठी जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडच्यावतीने जिल्हाधिकारी किसन जावळे यांना निवेदन देण्यात आले आहे. या कुटूंबाना तात्काळ मदत करून शासनाने त्यांना त्या ठिकाणी नवीन घरे बांधून द्यावीत. त्याचबरोबर त्यांना तेथे रस्ता, पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र आदिंसह दळणवळनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ केंडे, सचिव राजू आखाडे, सहसचिव राया ढेबे, सदस्य चंद्रकांत केंडे, धावू आखाडे, रवी बोडेकर, लक्ष्मण मरगळा आदिंसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.