बाधित शेतकर्यांना जलद नुकसान भरपाईची मागणी
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
रिलायन्स नागोठणे कंपनीची रसायनमिश्रित टाकाऊ सांडपाण्याची पाईपलाइन फुटून शिहू चोळे विभागातील शेतकर्यांचे सातत्याने नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समिती व नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना रिलायन्स कंपनीने विनाविलंब व जलद नुकसानभरपाई द्यावी अन्यथा आम्ही कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला.
वेळोवेळी तक्रारी अर्ज व नुकसान भरपाईची मागणी करूनदेखील नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकर्यांनी शुक्रवारी दि.(28) रोजी इस्टेट ऑफिसवर धडक देत रिलायन्स व्यवस्थापनाला आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी अनंत भुरे, रमेश घासे, नारायण म्हात्रे, धर्मा घासे, नामदेव घासे, भारती घासे, सुवर्णा घासे, नामदेव म्हात्रे, सखाराम गदमळे, धर्मा घासे, दिलीप घासे, सागर पाटील, लहू भुरे, कौसल्या पाटील, पूनम बैकर, हिराबाई भुरे, तृप्ती भोईर, झाकिबाई कुथे, सरस भोइर,पप्पी घासे आदी नुकसान बाधित शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे यांनी सुपीक जमिनीला रसायनमिश्रित सांडपाणी नापीक करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे सांगितले. रिलायन्स कंपनीने शेतकर्यांच्या रोजीरोटीचा विचार करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करू असा इशारा अनंत भुरे यांनी दिला. दरम्यान, शेतकर्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर रिलायन्स व्यवस्थापन नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.