पावसाळा जवळ आल्याने शेतकर्‍याची धांदल

माणगावात भातकापणीला वेग
अजूनही शिवारात भातपीक उभेच

। माणगाव । प्रतिनिधी ।
बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे. काही दिवसांनी मान्सूनच आगमन होणार आहे. रब्बी हंगामातील शेतात अजून भाताचे पीक उभेच आहे. तोपर्यंतच मान्सूनचे आगमन होत असल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तर, रब्बी हंगामातील भात कापणीच्या कामाचा ताण शेतकर्‍यावर पडत आहे. यंदाच्या वर्षी रब्बी हंगामातील भातपिकाची ज्या शेतकर्‍यांनी उशिरा पेरणी व लागवड केली, त्या शेतकर्‍यांच्या शेतात अजूनही अनेक ठिकाणी भातपीक उभे असून, ते हिरवेगार आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतात उभे असणारे भातपीक कापायचे कसे, असा प्रश्‍न आता शेतकर्‍याला पडला आहे. ज्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात पेरणी व लागवड सुरुवातीच्या कालावधीत केली, त्या शेतकर्‍यांच्या शेतात कापणी व मळणी चालू असून, तिला वेग आला आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत खरीप हंगामाच्या पिकासाठी उर्वरित शेतीची कामे कशी करायची असा सवाल शेतकर्‍यांपुढे उभा राहात असून, अजूनही शिवारात भातपीक उभेच आहे. त्यातच पाऊस माथ्यावर आल्याने शेतकर्‍यांची पुरती धांदल उडाली आहे. माणगाव तालुक्यातील पाणसई, कालवण, दाखणे, इंदापूर, मुठवली, कशेणे, माणगावसह अनेक गावांतील शेतकर्‍यांची रब्बी पीक कापणीची, तर कुठे कापलेल्या पिकाची मळणीसाठी, तर कुठे खरीप हंगामाच्या पेरणी व पेरणीपूर्व मशागतीसाठी पुरती धांदल उडाली आहे.

रब्बीतील भातपीक 900 हेक्टरवर
डोलवहाळ बंधार्‍यातून सुटणार्‍या कालव्याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यातील बहुतांशी शेती दुबार पिकासाठी अवलंबून असून, यंदाचे वर्षी कालव्याचे पाणी 30 डिसेंबर रोजी सुटले होते. त्यानंतर माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी भाताची पेरणी केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी रब्बी हंगामात माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी 900 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली असून, ज्या शेतकर्‍यांनी कालव्याला पाणी आल्याबरोबर भातपिकाची पेरणी केली होती, त्यांचे पीक तयार होऊन त्या पिकाच्या कापणीची कामे जोरात सुरु आहेत.

अवकाळीची धास्ती
ज्या शेतकर्‍यांनी कालव्याला पाणी सुटल्यानंतर उशिरा पेरणी व लागवड केली, अशा शेतातील भातपीक अजूनही हिरवेगार असून, ते कापायचे कसे, असा प्रश्‍न शेतकर्‍याला पडला आहे. ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था काही शेतकर्‍यांची झाली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. तर, ज्या शेतकर्‍यांनी कापणी सुरु केली आहे, त्या शेतकर्‍याच्या शेतात भातपीक कापून पडले आहे. त्यातच अवकाळी पावसाची भीती शेतकर्‍यांना आहे. त्याची धास्ती शेतकर्‍याने घेतली असून, मोठा प्रश्‍न त्याच्यापुढे पडला आहे.

खरीपाची कामे जोरात
यंदाच्या वर्षी माणगाव तालुक्यात खरीप हंगामासाठी 12 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाणार असून, शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व कामाला गती दिली आहे.जे शेतकरी फक्त खरीप हंगामावर अवलंबून आहेत, अशा शेतकर्‍यांनी बांधबंदिस्ती करणे, कुंपण, भाजनावळ, राब टाकणे यासारखी अनेक शेतीची कामे सुरु केली असून, ती कामे अखेरच्या टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी मेघराजाची अतुरतेने वाट पाहात आहे.

Exit mobile version