40 गावातील शेती येणार पाण्याखाली; दुबार शेतीसाठी पाण्याची आवश्यकता
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते. या पाण्यावर 40 गावातील शेतकरी दुबार शेती करीत असतात. दरम्यान राजनाला कालव्यात पाणी आल्याने शेतात पाणी वळवून जमीन ओली करण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत, मात्र 20 दिवस पाणी उशिरा सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
राजनाला कालव्याची निर्मिती कर्जत पूर्व भागातील शेती ओलिताखाली आनन्यासाठी झाली. पुढे त्या कालव्याचे पाणी शेतीसाठी दरवर्षी दिले जात असतांना वेळेवर कालाव्याची दुरुस्ती होणे गरजेचे असतांना ती न झाल्यामुळे कालवे अनेक ठिकाणी पोकळ झाले होते. शेवटी 2011 मध्ये राज्य सरकारने राजनाला कालाव्याची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर केला. साधारण 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्याचा डावा कालवा 21 किलोमीटरचा आहे. सध्या राजनाला कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने सर्व भागात शेती केली जात आहे. यावर्षी सावळा गावाच्या शिवारात देखील पाणी पोहचले असल्याने भाताची शेती त्या भागात अनेक वर्षांनी बहरणार आहे. कारण राजनाला कालव्याची दुरुस्तीचे काम सुरु झाल्यापासून म्हणजे किमान 14 -15 वर्षे या भागात कालव्याचे पाणी पोहचत नव्हते. मागील दोन वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अमित पारधे यांनी नियोजनबद्ध पणे कालव्यांच्या दुरुस्तीची अर्धवट पूर्ण केली आणि त्यामुळे कालव्यातुन पाणी सर्व भागात पोहचु लागले आहे.
यावर्षी 29 डिसेंबर रोजी राजनाला कालव्याच्या झिरो बंधाऱ्यातून पाणी कालव्यात सोडले गेले असून, आतापर्यंत कालव्याच्या 15 किलोमीटर हुन अधिक भागातून पाणी पुढे पुढे जात आहे. मात्र, एक किलोमीटर लांबीचा झिरो बंधारा मधून जाणारे पाणी पुढे उजवा कालवा, डावा कालवा, पोटल कालवा आणि हेदवली कालव्यातून पाणी पुढे जात असते. राजनाला कालवा परिसरातील 25 गावातील शेतकरी 2000 हुन अधिक हेक्टर जमिनीवर भाताची शेती घेत. मात्र, मागील पाच वर्षे दुरुस्तीसाठी बंद असलेल्या राजनाला कालव्यात पूर्ण क्षमतेने पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी मुख्य कालव्यातून पोट कालव्यातून आपल्या शेतात येणार खात्रीने 25 गावातील शेकडो शेतकऱ्यांनी जमिनीत लागवड कारण्यासाठी भाताची नवनवीन वाण बाजारातून खरेदी करून ठेवली होती. मात्र, दुबार शेती करीत असताना कमी वेळेत भाताचे पीक तयार व्हावे यासाठी 110 ते 115 दिवसात शेतात पीक तयार होणारे रत्ना जातीच्या वाणाला सर्वाधिक पसंती शेतकरी देत असतात. हायब्रीड जातीची वाण यांचे पीक हातात येण्यासाठी किमान 125 दिवसांचा आणि कधी त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे उन्हाळी शेती करतांना वेळेचे नियोजन महत्वाचे असल्याने रत्ना जातीच्या वाणाला अधिक पसंती शेतकरी देत असतात, राजनाला मुख्य कालव्यात पाणी सोडले गेले, त्यानंतर ते पाणी शेतात पोहचले असून पोटनाल्यातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वळवून शेते ओली करून ठेवली आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या घरी असलेल्या पॉवर ट्रेलर किंवा ट्रॅक्टरच्या नांगराच्या माध्यमातून शेताची नांगरणी सुरु केली आहे.







