आंबा पीक विम्याच्या रकमेपासून शेतकरी वंचित

बागयतदारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी बांधव मागील वर्षी आंबा पीक विम्याची रक्कम जमा खात्यास जमा न झाल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये नाराजी असून, त्यांनी कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांच्या माध्यमातून नुकतीच जिल्हाधिकारी किसन जावळे यांची भेट घेऊन तक्रार दिली. यावेळी आंबा पीक विम्याचे पैसे खात्यात आलेले नाही. मात्र, नवीन पीक विमा काढण्यासाठी आग्रही केले जात असल्याचा आरोप केला आहे.

यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक कुलकर्णी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी यांनी नोव्हेंबर महिन्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते जमा न झाल्यामुळे तुमची भेट घ्यावी लागली, असे मत शेतकरी बांधव यांनी व्यक्त केले. शेतकरी शेतीबरोबर फळ झाडे लागवड करीत असतो. मात्र, बदलत्या वातावरणामुळे आलेले पीक वाया जात असल्यामुळे झालेले नुकसान कसे भरायचे हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र, आम्ही शेतकरी पीक विमा काढूनसुद्धा वेळेवर आमचे नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे या कंपनीसंदर्भात नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर ट्रिगरमुळे सर्वच ठिकाणी नुकसान झालेचे कळत नाही. यामुळे त्या ठिकाणी पाहणी करूनच शेतकरी बांधवांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Exit mobile version