शेतकरी नडला, जमीन लाटण्याचा प्रयत्न फसला?
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सत्ता मिळाली की कायदेही आपल्या सोयीने वाकवायचे, असा प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक चर्चा सध्या अलिबाग तालुक्यात रंगत आहे. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत बेकायदेशीरपणे येणारे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनाही चालते केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य नागरिकांना नियमांच्या चौकटीत अडकवले जाते; मात्र सत्ताधाऱ्यांसाठी वेगळीच मोजपट्टी वापरली जाते का, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहे. म्हात्रोळी परिसरातील जमीन व्यवहार आणि त्यानंतर सुरू झालेल्या कथित मोजणीच्या हालचालींमुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अलिबाग तालुक्यातील जमिनींचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. सेलिब्रिटींसह राजकीय नेतेही अलिबागमध्ये जमिनी खरेदी करण्यामध्ये अग्रेसर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जमिनींच्या वाढत्या भावामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आमिष दाखवून व वेळप्रसंगी दबाव आणून कवडीमोल किमतीत हजारो एकर जागा विकत घेतली असल्याचे अलीकडेच समोर आले. तो सत्ताधारी नेता कोण, हा प्रश्न संबंध अलिबागकरांना पडला होता.
अशातच गुरुवारी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा जागेसंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आणि अलिबागकरांच्या मनात संशय निर्माण झाला. कालपासून व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील नेमकं सत्य काय? व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करुन बनविला आहे की खरा आहे, हे ‘कृषीवल’च्या टीमने जाणून घेतलं. त्यातूनच नार्वेकरांचा तो व्हिडिओ खरा असल्याचे समोर आलं आहे. याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम ‘कृषीवल’ने जाणून घेतला असून, लवकरच ते प्रकरण संपूर्ण रायगडकरांसमोर येणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुटुंबियांच्या नावाने अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथे जमिनी खरेदी केल्या आहेत. अजून जमिनी खरेदी करण्यासाठी नार्वेकर म्हात्रोळी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी नार्वेकरांच्या उपस्थितीत शेजारच्या मालकाला न कळविता सत्तेचा वापर करुन आणि नियमांना बगल देत सरकारी मोजणी करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी झालेल्या सरकारी मोजणीत शेतकऱ्याची जागा सेजल शहा यांच्या हद्दीत येत नसल्याचे समोर आले होते. मात्र, तरीही सरकारी मोजणीच्या नावाखाली नार्वेकरांनी खासगी मोजणी करणाऱ्यांसह दुसऱ्याच्या जागेत घुसखोरी केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सत्तेचा प्रभाव वापरून सरकारी यंत्रणा खासगी हितासाठी वाकवली जात असेल, तर तो केवळ एका व्यक्तीचा प्रश्न राहात नाही, तर संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारा मुद्दा ठरतो. विशेषतः महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष यासारख्या लोकशाही संस्थेच्या पदावर असलेल्या व्यक्तींबाबत असे आरोप समोर येणे ही राज्यासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
‘तो’ सत्ताधारी नेता कोण?
अलिबाग तालुक्यातील हजारो एकर जागा घेणारा तो सत्ताधारी नेता कोण? याबाबतचे पुरावे ‘कृषीवल’च्या हाती आले असून, लवकरच लँड डिलिंग करणारे आणि बेछूटपणे जागा खरेदी करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांचे पितळ उघडे पडणार आहे. खारेपाटासह मांडवा, रेवस, बोडणी, मिळकतखार, म्हात्रोळी, झिराड, वाघ्रण आदी ठिकाणी कोणता सत्ताधारी नेता जमिनीचे व्यवहार करीत आहे, साठेकरार कसे झाले आहेत, दलालांची रखडलेली टक्केवारी याबाबतची माहितीही ‘कृषीवल’च्या हाती आली असून, कोणत्याही शेतकऱ्याला त्यांच्या जागेबाबत कसलीही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधा. तुमचे नाव कायम गुलदस्त्यात राहील, ही जबाबदारी आमची राहील.
नार्वेकरांचे व्यवहार सुरुच
राहुल नार्वेकर यांना अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात सेजल शहा यांची जागा खरेदी करायची आहे. अडीच एकर जागा खरेदी करण्याचा व्यवहार सुरू होता. शुक्रवारी राहुल नार्वेकर हे जागा मोजण्यासाठी तिथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत जागा मोजणी करणारे कर्मचारीही होते. सेजल शहा यांच्या जागेला लागून शेतकऱ्याची जागा आहे. मोजणी करताना लगतच्या जागा मालकांना नोटीस देणे बंधनकारक असतानाही मोजणीची कोणतीही नोटीस न देता राहुल नार्वेकर हे मोजणी करीत होते, असे समजते. या कारणावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला असता त्यावरून बाचाबाची झाली, अशी चर्चा आहे.
नार्वेकरांच्या नावावर किती जमिनी?
म्हात्रोळी येथे ॲड. राहुल नार्वेकर यांचा भाऊ मकरंद नार्वेकर यांच्या नावाने 1.86 हेक्टर जागा, तर पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या नावाने 6.22.40 हेक्टर जागा यापूर्वीच खरेदी करण्यात आली आहे.
कोकणातील जमिनी गुजरातमधील गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी ताब्यात घेतल्या जात आहेत. महसूल यंत्रणेवर दबाव टाकून जमिनीचे व्यवहार करण्यात येत आहे. कोकणाला पैशांच्या मोहापायी गुजरात बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांनी घटनात्मक पदाची मर्यादा विसरुन जमीन व्यवहारात हस्तक्षेप करणे अत्यंत गंभीर बाब आहे. सत्तेचा वापर करुन स्थानिकांवर दबाव टाकला जात असेल, तर तो लोकशाहीवरील आघात आहे. राज्य सरकारने सामान्य शेतकरी व स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करावे.
– खा. संजय राऊत
