म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
| म्हसळा | वार्ताहर |
तालुक्यातील शेतकर्यांनी रानावनात किंवा गावाचे आसपास चरण्यासाठी सोडलेली गुरे घरात परत येतच नसल्याने ती जातात कुठे असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. म्हसळा तालुक्यात अनेक शेतकर्यांची दुभती गाय जनावरे आणि नागरिकांचे बैल चोरीला जात असल्याची घटना व तक्रारीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गोधन चोरीला गेल्याच्या अनेक घटनांचा उलगडा होऊन पोलिसांनी आरोपींनी बेड्या ठोकल्या असल्या तरी गोधन चोरीच्या घटना अधूनमधून घडतच आहेत. म्हसळा शहराला लागुनच असलेल्या खारगाव खुर्द येथील शेतकरी चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांच्या मालकीची पांढर्या रंगाची नऊ वर्षांची दुभती गाय आणि दोन वर्षांची कालवड एप्रिल महिन्यापासून चोरीला गेली आहे. याबाबत शेतकरी चंद्रकांत कांबळे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात गोधन चोरी झाल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी गुरेचोरी करणार्यांवर पाळत ठेवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.