वेंगुर्ला सात व वेंगुर्ला चार या जातीची लागवड
| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
श्रीवर्धन तालुक्यातील उत्तम निचर्याची जमीन, थोड्या फार प्रमाणात आम्लयुक्त जमीन तसेच डोंगर उतारावरील तांबडी मातीच्या जमिनी या काजू पिकासाठी योग्य आहेत. वरकस जमिनीत काजूचे झाड चांगले पोसले जाते. समुद्रसपाटीपासून सातशे मीटर उंचीपर्यंत काजू पीक चांगल्या प्रमाणात येते. तालुक्यातील उष्ण व दमट हवामान काजूसाठी अनुकूल असल्याने येथील बागायतदारांनी 1165 हेक्टर क्षेत्रात काजू लागवड केली असून, 670 हेक्टर क्षेत्रात बागायतदार काजू पिकांचे उत्पादन घेत आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात 2016-2017 सालापर्यंत आंबा बागायतदार आपापल्या जागेत हौसेखातर काजू कलमांची लागवड करीत असत. हापूस आंबा पीक हे एक वर्षाआड येत असल्याने आंबा बागायतदारांनी काजू उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. श्रीवर्धन तालुक्यातील बागायतदारांनी वेंगुर्ला सात व वेंगुर्ला चार या दोन काजूच्या सुधारीत व विकसित जातींची लागवड केली. आज आंबा पिकाखालोखाल काजू पिकाचे उत्पादन बागायतदार घेत आहेत. तांबडा बोंडाचा रंग असलेल्या वेंगुर्ला चार जातीत एका किलो वजनात 140 बिया व बीमधील गराचे प्रमाण तीस टक्के, तर पिवळा बोंडाचा रंग असणार्या वेंगुर्ला सात जातीत एका किलोत शंभर बिया व बीमधील गराचे प्रमाण एकतीस टक्के इतके असते.
काजू लागवडीच्या सुरूवातीपासून झाडांची चांगली निगा राखल्यास काजूच्या झाडांना लागवडीनंतर तिसर्या किंवा चौथ्या वर्षात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते आणि पुढे चाळीस ते पन्नास वर्षे काजूचे नियमित उत्पादन मिळते. काजूच्या झाडाला नोव्हेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरुवात होते. मोहोर आल्यानंतर फळ तयार होण्यासाठी पासष्ठ ते सत्तर दिवसांचा कालावधी लागतो. सर्वसाधारपणे मोहोर दोन ते तीन वेळा येतो. यापैकी जास्त फळे दुसर्या वेळी म्हणजे डिसेंबर, जानेवारी महिन्यांत आलेल्या मोहोराला येतात म्हणून या काळात उत्पादनात वाढ करण्यासाठी काजूच्या मोहोराची निगा राखणे अत्यंत आवश्यक असते. लवकर येणार्या मोहोरापासून तयार होणारी फळे 60 दिवसांत काढणीसाठी योग्य होतात, तर उशिरा आलेल्या मोहोरापासून तयार होणारी फळे 45 दिवसांत काढणी योग्य होतात.
काजू बर्फीकरिता श्रीवर्धन तालुक्यातील स्वीटमार्ट चालक तसेच रिसॉर्ट, हॉटेलमधून काजू उसळ, शाही पुलाव, शिरा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बागायतदारांकडून ओला काजूगर, सुकवलेला काजूगर खरेदी केला जात आहेत. मसाला काजू, खारे काजूंना तालुक्यातील बाजारपेठांत चांगली मागणी आहे.
काजू पिकाच्या लागवडीसाठी फळबाग लागवड योजनेंतर्गत अनुदान आहे. तसेच काजू फळ प्रक्रियेसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत अनुदान आहे. श्रीवर्धन तालुक्यातील काजू बागायतदारांनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा.
श्रद्धा किरण डुंबरे,
कृषी अधिकारी, श्रीवर्धन
काजू प्रक्रिया व्यवसाय हा एक फायदेशीर उद्योग मानला जातो. स्थानिक तरूणांनी या व्यवसायात गुंतवणूक करावी. काजू आधारित स्नॅक्स, काजूचे पीठ व इतर उत्पादने तयार करून व्यवसाय करता येऊ शकतो. काजूच्या टरफलापासून तेल काढले जाते. या तेलाचा उपयोग विविध उद्योगांमध्ये होतो. शाई, रबर व रासायनिक उत्पादनासाठी वापर होऊ शकतो.
हिदायत कुदरूते,
काजू बागायतदार, बागमांडला