| खरोशी | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि भुमीपुत्रांना महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रकल्पातर्फे राष्ट्राच्या विकासाचा आणि सार्वजनिक प्रयोजनाचा सुवर्णकाळ दाखविण्यात आला होता. त्यासाठी हजारो एकर सुपीक भूमी देखील स्थानिकांकडून घेण्यात आली होती. परंतु, हाच प्रकल्प आज येथील शेतकरी वर्गासाठी एक भीषण अन्याय ठरला आहे. हा प्रकल्प अधिकृतपणे रद्द झाल्यानंतरही त्या जमिनी मूळ मालकांना परत न करता या जमिनी शासन जमा करण्याचा चाललेला कुटिल डाव अत्यंत संतापजनक असून, त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे.
गेल्या काही काळापासून या कायदेशीर आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नावर प्रशासनाची आणि शासनाची भूमिका अत्यंत दुतोंडी व संशयास्पद राहिली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनींवर डल्ला मारण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दि.28 जुलै रोजी दिलेला एकतर्फी व सदोष अहवाल हा सरळ-सरळ शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे. दरम्यान, प्रशासनानेही या जनक्षोभाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. पेणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंतिम धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तातडीने हे प्रकरण अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मंत्रालयातील प्रधान सचिव महसूल वन विभाग यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाठवले आहे. मात्र, केवळ कागदी घोडे नाचवून किंवा प्रशासकीय दिरंगाई करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न आता खपवून घेतले जाणार नाहीत. हा केवळ जमिनीचा लढा नसून, येथील समाजाच्या अस्तित्त्वाचा लढा आहे. त्यामुळे प्रत्येक सेझ बाधिताने आपल्या पिढीजात जमिनी पूर्ववत परत मिळवण्यासाठी व आपल्या मातीचा अधिकार जिद्दीने मिळवण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आता आरपारची लढाई लढण्याचे निश्चित केले आहे. सेझ बाधितांच्या वडिलोपार्जित जमिनी शासन जमा करण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रशासनाला पुर्ववत परत मिळवण्यासाठी दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पेणमधील महात्मा गांधी मंदिर येथून एक प्रचंड भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा थेट उपविभागीय कार्यालयासमोर धडकणार असून, पेण तालुक्यातून हजारो शेतकरी व भूमिपुत्र मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत.
सेझच्या विरोधात शेतकरी आंदोलन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606