। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, या गावांसह डोंगरीची वाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी, चिंचेचीवाडी ह्या आदिवासी वाड्यांतील नागरिकांनी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी अलिबाग येेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी( 18 नोव्हेंबर) आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
मागील 12 वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या 52 वर्ष जुन्या व नादुरुस्त व बंद पडलेल्या चावणे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे पाताळगंगा नदीतील प्रदूषित पाणी कोणत्याही जलशुद्धीकरण प्रक्रियेविणा पुरवठा केला जातो. तोही आठवड्यातून एक ते दोन वेळा फक्त अर्धा तास. पाणी पुरवठा विभाग आणि ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशांनाही केराची टोपली दाखवून वरील निर्णयांबाबत कोणतीही कारवाई केलेली नसल्याच्या निषेधार्थ हे उपोषण सुरु करण्यात आले आहे.
राष्ट्र सेवा दल संघटनेचे रायगड जिल्हा संघटक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ज्योती पाटील, विजया मांडवकर, रेखा कालेकर, राजेश्री म्हामणकर,दर्शना म्हामणकर, निता नरेश वाघे, मानसी वाघे ,आशा शेडगे, सविता पवार, सुरेखा वाघे, राजेश्री भोसले व ग्रामस्थ बेमुदत आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत अकार्यक्षम अभियंते आणि सरपंचांवर कारवाई करून पंचवीस ऑक्टोबर रोजी झालेल्या निर्णयांवर प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार केला आहे जोपर्यंत अकार्यक्षम अभियंते आणि सरपंचांवर कारवाई करून 25 ऑक्टोबर रोजी झालेल्या निर्णयांवर प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार केला आहे.