। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पालांडे यांनी मुले व मूली वस्तीगृहास भोजन ठेका चालविण्यासाठी घेतला होता. मात्र भोजन सेवा दिल्याची रक्कम या संस्थेकडून मिळत नसल्याची तक्रार पालांडे यांनी दि.29 जून रोजी पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिली आहे. लवकरात लवकर सदरची थकीत बिले मिळाली नाहीत तर शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेविरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पालांडे व अन्य सहकारी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. आदिवासी वसतिगृहातील मुलांना भोजन देण्याचे काम पालांडे व त्यांच्या महिला सहकारी करीत होत्या. संस्थेच्या वतीने अशोक तांबे यांनी ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिविद्यार्थ्यांकडून 2700 रुपये महिन्याला अदा करण्याचे ठरले होते. याप्रमाणे 9 फेब्रुवारी 2022 पासून पालांडे यांनी मुली व मुले या दोन्ही वसतिगृहात नियमित भोजन पुरवठा केला. मात्र ठरल्याप्रमाणे रक्कम अदा झाली नसल्याचे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे वसतिगृहाकडून सदर संस्थेला 31 मार्च 2022 अखेरची रक्कम अदा करण्यात आली, तरीही संस्थेने रक्कम अदा केली नाही, त्यामुळे अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पालांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. संस्थेचे पदाधिकारी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत नंदिनी पालांडे यांची थकीत बिले मिळावीत यासाठी संस्थेच्या पदाधिकारी यांना दूरध्वनीवरून सूचना दिलेल्या आहेत. लवकरच बिलाची रक्कम अदा होईल अशी अपेक्षा आहे.
दिलीप रायन्नावार, तहसीलदार पाली सुधागड