गॅरेज तोडण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील तळोजा गावात गॅरेज तोडल्याच्या रागातून हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धारदार चाकू, लोखंडी रॉड, लाकडी बांबू आणि दांडक्यांनी बेछूट हल्ला करण्यात आला. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, मोटार दुरुस्ती गॅरेजवरील तक्रारीच्या वादातून हा हल्ला झाला. सय्यद परिवाराच्या तक्रारीनंतर सिडको अतिक्रमण विभागाने तीन वेळा गॅरेज तोडले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी हल्ला केला. ही घटना घडली तेव्हा सय्यद कुटुंबातील काही युवक घरी होते. त्यावेळी रौफ रजाक पटेल (60) याच्यासह अफनान पटेल, सफवान पटेल, नवमान मुनाफ पटेल आणि इतर आठ-दहा जणांनी सय्यद परिवारातील युवकांवर अचानक जीवघेणा हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नौफिल हानीफ सय्यद (40) यांनाही मारहाण आणि धमकी देण्यात आली. सैफ हानीफ सय्यद (24), सलमान सुफियान सय्यद (19) आणि सफवान करीम तिदारे (27) हे गंभीर जखमी झाले आहेत. तळोजा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून स्टीलच्या चाकूचे कव्हर जप्त केले आहे. मुख्य आरोपी रौफ पटेल याला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत.

Exit mobile version