। जालना । प्रतिनिधी ।
अज्ञात कारणावरून लहान भावाने काही नातेवाईकांच्या मदतीने मोठ्या भावाचा व पुतण्याचा भरदिवसा चाकू भोसकून हत्या केली. ही दुर्दैवी घटना जालन्यातील बदनापूर शहरातील शंकरनगर भागात घडली असून अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे असे मृतांची नावे आहेत.
बदनापूर शहरातील शंकर नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. अशोक अंबिलढगे व त्यांचा लहान भावात काही कारणावरून मंगळवारी (दि. 13) सकाळी बाचाबाची होऊन मारहाणीची घटना घडली. हा वाद झाल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास अशोक अंबिलढगे (55) व त्यांचा मुलगा यश अंबिलढगे (22) हे आपल्या घरात बसलेले असताना अचानक लहान भाऊ विष्णू व त्याच्यासोबत अन्य काही नातेवाईक, मित्र आले आणि पुन्हा वाद-विवाद सुरू झाला. यावेळी आलेल्या नातेवाईक, मित्रांपैकी काही जणांनी थेट अशोक अंबिलढगे यांच्या पोटात तिक्ष्ण हत्याराने वार केले. तसेच यश अंबिलढगे याच्या गळ्यावर चाकूचे वार केले. यात ते दोघेही रक्ताबंबाळ झाले. अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे यांना तात्काळ बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे बदनापूर शहरात खळबळ उडाली असून विष्णू अंबिलढगे यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.