। यवतमाळ । प्रतिनिधी ।
यवतमाळमधील वणी-घुग्गुस मार्गावर लालगुडा गावाजवळ ओम नगरी येथे भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात वडिलांसह तीन मुलींचा मृत्यू झाला, तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.
वणी येथील भीमनगर परिसरात राहणारे रियाजुद्दीन शेख (55) यांचे लाल पुलिया परिसरात गॅरेज आहे. सध्या सुटी असल्याने ते त्यांची मुलगी मायराला (17) कार शिकवत होते. यावेळी कारमध्ये रियाजुद्दीन यांच्या जोया शेख (13), अनिबा शेख (11) या मुलींसह त्यांच्या भावाची मुलगी इनाया शकिरुद्दिन शेख (5) हीसुद्धा होती.
लालगुड्याच्या आधी ओम नगरी जवळ डीपी रोडवर मायरा कार चालवत होती. यावेळी वळण घेत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा ड्रायव्हर बाजूकडील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. सर्वांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मायरा, जोया आणि अनिबा यांना मृत घोषित केले. वडील रियाजुद्दीन शेख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. भावाची मुलगी इनाया ही गंभीर जखमी झाल्याने तिला चंद्रपूर आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.







