यंदाच्या विश्वचषकात भारताव्यतिरिक्त सामन्यांसाठी प्रेक्षक आणायचे कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात यजमान बीसीसीआय आणि आयसीसी सध्या व्यस्त होते. आणि शनिवारी अचानक या दोघांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात या प्रश्नाचे उत्तर मिळाले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतात आलेल्या प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीही हा एक धक्का होता. कारण गतविश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील इंग्लंड-न्यूझीलंड या दोन संघांमधील लढतीसाठीही प्रेक्षक आले नव्हते. अहमदाबाद येथील तो सलामीचा सामना होता.
50 षटकांचे क्रिकेट सध्या व्हेंटिलेटरवर आहे. भारतीय क्रिकेट रसिकांचा श्वास आधार त्या क्रिकेटला हवा आहे. अहमदाबाद पाठोपाठ, लखनौ, हैदराबाद, धरमशाळा आदी ठिकाणी भारताव्यतिरिक्त सामन्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली होती. आणि आज अचानक विश्वचषकाच्या 20व्या सामन्यात, वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी गर्दीकेली होती. सामना सुरु झाल्यानंतर सुरु झालेला प्रेक्षकांचा ओघ अखेरपर्यंत कायम होता. दीड-दोन तासानंतर प्रेक्षक संख्या 20 हजारावर पोहोचली होती. दक्षिण आफ्रिकेचा डाव संपायच्या आधीच स्टेडियम जवळ जवळ पूर्ण भरत चालले होते. भारतीय क्रिकेटच्या पंढरीत, मुंबईत, दर्दी क्रिकेट रसिक आहेत. दक्षिण आफ्रिका आणि गतविश्वचषक विजेत्या इंग्लंडसंघांतील झुंज म्हणजे या प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. त्यामुळे परदेशी प्रसिद्धी माध्यमांना आधी आश्चर्य वाटले. कारण या विश्वचषकात त्यांनीही त्यांच्या संघांच्या लढतीच्यावेळी रिकामी स्टेडियम पाहिली होती.
मुंबईकरांना मात्र या गर्दीचे आश्चर्य वाटले नाही. मुंबईकरांनी या आधीही सर्व परदेशी संघांच्या गुणांची कदर केली होती. सच्चे क्रिकेटप्रेमी हा मुंबईच्या क्रिकेट रसिकांचा लौकीक आहे. यजमान मुंबई क्रिकेट संघटना प्रत्येक सामन्याच्या तिकिट वाटपांसाठी यंत्रणा राबविते. मुंबई किक्रेटचे स्वत:चे क्लब सदस्य आहेत. या सदस्यांचे स्वत:चे हजारो क्रिकेटपटू आहे. नवोदित उदयेोन्मुख क्रिकेटपटू सदैव चांगले क्रिकेट पाहण्यासाठी तत्पर असतात.या सर्वांनी चांगले क्रिकेट पाहण्याची संधी कायम उपलब्ध असते, जी संधी आजही त्यांनी साधली.
आपापल्या क्लबना, आपल्या खेळाडूंना क्रिकेट पाहता यावे यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची क्रिकेटचे वर्षापासूनची परंपरा आहे. प्रथम सर्व क्लबसची मागणी विचारात घेतली जाते. शाळा-महाविद्यालयांच्या क्लबना त्यांच्या वाट्याची तिकिटे दिली जातात. मुंबई क्रिकेटच्या पाच स्थापनेपासून असलेल्या क्लबना त्यांच्या वाट्याची तिकिटे दिली जातात. असोसिएशनमध्ये असलेल्या एका व्यापारी क्लबमध्ये त्यांचा कोटा दिला जातो. शिवाय बीसीसीआय, राज्य सरकार, आयसीसी आणि मुंबई महापालिका अन्य संस्थांच्या मालकीचाही कोटा असतो. त्यामुळे खुल्या बाजारात विक्रीसाठी फारशी तिकिटे शिल्लक नसतातच.
विश्वचषकासारखी दजेदार स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा दर्जेदार सामना असताना हे सर्व क्रिकेटशी निगडीत क्लब आणि संस्था तिकिटे घेतातच.त्यामुळे आयोजकांना अन्य देशांच्या सामन्यांसाठी प्रेक्षक येणार कुठून ही समस्या वाटत असली तरीही मुंबई क्रिकेटला तसे कधीच वाटले नाही. दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठी सच्चा मुंबईकर क्रिकेट रसिक हा हजर असतोच. जेव्हा खेळणाऱ्या दोन्ही संघांत नामवंत खेळाडू असतात. तेव्हा तर ती मुंबईकर एक पर्वणीच मानतात.भारतात क्रिकेट अधिक पिकते आणि विकले जाते हे आयसीसीला आज कळून चुकले असेलच. बीसीसीआयने देखील सामन्यांच्या वाटपाच्यावेळी क्रिकेटचे हे प्रेम, आपुलकी नजरेसमोर ठेवावी. त्याचा आदर करावा. विश्वचषक स्पर्धेसारख्या स्पर्धेचा तरच आदर, मानसन्मान राखला जाईल.
Email: vinayakdalvi41@gmail.com