| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला असलेल्या श्री गजानन महाराज मंदिर येथील इमारतीमध्ये गुरुवारी (दि.18) सकाळी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये त्या फ्लॅटमधील किमती सामानाचे नुकसान झाले आहे.
नेरळ गावातील श्री गजानन महाराज मंदिरामागे असलेल्या इमारती मधील ‘ए’ विंगमध्ये सकाळी आग लागली. त्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणारे मिलिंद पटवर्धन हे आपला ॲक्यू प्रेशर दवाखाना आपल्या राहत्या घरामध्ये चालवतात. इमारत जुनी असल्याने पाण्याची गळती स्लॅबमधून होऊन इमारतीमध्ये पाणी मुरत असते. ते पाणी मिलिंद पटवर्धन यांच्या घरातील स्लॅबमधून भिंतीमध्ये जात असल्याने काही भागातील भिंती ओल्या होत्या. त्या फ्लॅटमधील छताला लावलेल्या पंख्याच्या जोडणीसाठी वापरलेल्या विजेच्या वाहिनीत ते पाणी मुरत होते आणि आज सकाळी सव्वा सहा साडे सहाच्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाले.
पंख्यातून हा स्फोट खाली आला आणि घरात असलेले टीव्ही, फ्रीज तसेच ॲक्यू प्रेशरसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच घरातील अन्य किमती साहित्य जळू लागले. त्यावेळी आजुबाजूला राहणाऱ्या रहिवाशांच्या ही घटना लक्षात आली आणि स्थानिकांची धावपळ झाली. घरमालक पटवर्धन हे नेरळ गावातील आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेल्याने घरात कोणीही नव्हते. आग लागल्याची माहिती पटवर्धन यांना देण्यात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील आपल्या नातेवाईक यांच्या घरातून तत्काळ पोहचले. त्यानंतर कुलूप उघडून स्थानिकांनी मोठ्या हिमतीने घरात प्रवेश केला आणि घरातील गॅस सिलिंडर उचलून घराबाहेर आणले.
ही आग स्थानिक रहिवाशी यांनी समन्वय साधून आटोक्यात आणली. घरातील पाणी त्या आगीच्या लोळ यांच्यावर टाकण्यात आले. त्यामुळे आग विझली परंतु, या आगीमध्ये घरातील साधारण दीड लाख रुपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. स्थानिक रहिवाशी नितीन कांदळगावकर यांनी कर्जत येथील अग्निशमन केंद्र येथे संपर्क साधल्यावर देखील कोणीही नेरळ येथे आग विझवण्यासाठी पोहचू शकले नाही. आग विझवून झाल्यानंतर नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले असून, त्यांच्याकडून नोंद करून घेण्यात आली. पोलिसांनी नुकसानीचा पंचनामा केला असून, महसूल विभागाच्या नेरळ तलाठी कार्यालयाला कळविण्यात आल्यानंतर सायंकाळी सहावाजेपर्यंत महसूल विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहचला नव्हता.’
लागोपाठ दुसरी आग
बुधवारी (दि.17)पहाटे साडेपाच वाजता आंबिवली गावातील सदाशिव कराळे यांच्या घराला आग लागून त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संपूर्ण घर जळून गेले होत. आज सकाळी नेरळ गावातील मिलिंद पटवर्धन यांचे घर या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
