गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..
रायगड जिल्ह्यात शनिवारी पाच दिवसांच्या गौरी-गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. पावसात न्हाऊन निघालेले रायगडकर, मिरवणुकांच्या मार्गांवर घालण्यात आलेल्या रांगोळ्यांच्या पायघड्या अशा मंगलमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला. ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ असे म्हणत जणू पुढच्या वर्षी लवकर येण्याचे वचन घ्यायला विसरले नाहीत. जिल्हाभर विसर्जन मिरवणुका काढून बाप्पाचा जयजयकार करण्यात आला. दरम्यान, विसर्जन घाटावर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांचा महासागर पाहावसाय मिळाला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
कोलाड विभागात भक्तीमय वातावरणात विसर्जन
गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी बाप्पांच्या आगमना पासून ते पाच दिवसांच्या विसर्जनातही रिमझिमसह सुरू असलेल्या पावसामुळे भक्तगणांचा थोडा हिरमोड झाला होता. तरिही टाळ-मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तगणांनी आवडत्या बाप्पाला व मोठ्या जल्लोषात गौराईना निरोप दिला. यावेळी कोलाड, खांब, सुतार वाडी परिसरात विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी झाली होती.

कोलाड विभागातील एकूण घरगुती गणपती 1138 व 254 गौवराई ना तमाम गणेशभक्तानी भक्तीमय वातावरणात निरोप दिला आहे. यावेळी कोलाड विभागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी चोख बंदोबस्त ठेवले होते. यावेळी नरेश पाटील उपस्थित होते.
बाळसई येथील पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप
नागोठणे विभागासह बाळसई, वाकण, पाटणसई, वांगणी, आमडोशी, सुकेळी परिसरातील गणेशभक्तांनी पाच दिवसांच्या आपल्या लाडक्या बाप्पाला तसेच गौंरीना निरोप दिला.

बाळसई गावातील जवळ-जवळ 90 ते 100 गणपती बाप्पांची सायं. 4 वाजण्याच्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन मिरवणुकीसाठी काढण्यात आले. यावेळी ढोल-ताशाच्या गजरात सर्वच भक्तगण नाचण्यामध्ये दंग झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या…! एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार’ अशा नामघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंबा नदी घाटावर सामुदायिक आरती झाल्यानंतर सर्वच गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला.
भक्तीमय वातावरणात विसर्जन
खांब विभागात पाच दिवसांच्या गणपतींचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात वाद्यांच्या गजरात सार्वजनिक तलाव, नाले, नदी पात्रात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करून भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले.

दरम्यान विसर्जन समयी पावसाने ब-यापैकी उघडीप दिल्याने गणेश भक्तांना तेवढाच दिलासा मिळाल्याने गणेशाचे विसर्जनही सुरळीतपणे पार पडले.
मुरूड तालुक्यात तीन हजार बाप्पांना निरोप
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. गजरात शनिवारी मुरूड तालुक्यातील 71 गावांतील पाच दिवसांच्या सुमारे 3 हजार गणेश मूर्ती आणि सुमारे 500 गौराईंचे ठिकठिकाणच्या समुद्रकिनारी आणि नदीतून विधीवत विसर्जन करण्यात आले. मात्र, सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसत होते. सायंकाळीदेखील संततधार कायम होती. शिघ्रे नदीत वाणदे, तेलवडे, नागशेत, जोसरांजन, शिघ्रे, नविवाडी आदी ठिकाणच्या गावातील तर खारआंबोली नदीत आंबोली, गोयगाव, उंडरगाव येथील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आगरदांडा, डोंगरी, नांदगाव, बोर्ली, कोर्लई, साळाव, खांमदे, उसडी, जमृतखार, एकदरा, राजपुरी, सर्वे, काशीद, बारशिव, मुरूड शहर, विहूर आदी गावांतील मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यात आले.

उर्वरित काकळघर, सुपेगाव आणि अन्य गावांतील मूर्ती नदीतून विसर्जन करण्यात आल्या. यावेळी तेलवडे ग्रामपंचायत उपसरपंच निलेश तांबडकर उपस्थित होते. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने मुरूड, नांदगाव शहरातदेखील गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका समुद्रकिनाऱ्याकडे सायंकाळी 5 वाजता सुरू झाल्याचे दिसत होते. मुरूड नगरपरिषदेने विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्था, निर्माल्य जमा करणारे कलश, स्वागत कमानी, मूर्ती साठी टेबल व्यवस्था, जीवरक्षक, मार्गदर्शक नेमले होते.
नागोठणे परिसरातील बाप्पांना निरोप
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर व परिसरांतील पाच दिवसांच्या 1080 खासगी व रिलायन्स टाऊनशीप, कातळावाडी व पिंपळवाडी येथील 3 सार्वजनिक गणपती बाप्पांना तसेच माहेरवासीन असलेल्या 375 गौरींना शनिवार दि. 23 सप्टेंबरला भाववपूर्ण निरोप देण्यात आला. नागोठणे शहर व ग्रामीण भागात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी सायंकाळी चार वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती. विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांकडुन पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत, गाजत, नाचत बाप्पांची मिरवणूक काढली.

अंबा घाटावर विसर्जन स्थळी नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाकडून बाप्पांवर पुष्पवृष्टीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नागोठण्यातील श्री सेवकांकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नागोठण्यातील व परिसारातील विसर्जन स्थळी नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि संदिप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अलिबाग तालुक्यातील ढवर येथे पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिभावाने, भजन-कीर्तन करीत गौरी गणपतीचे विसर्जन पार पडले.
तळा तालुक्यात गणरायाला निरोप
पाच दिवसांच्या गौरी गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावर्षी तळा तालुक्यात पाच दिवसांच्या 2712 गणेशमूर्तींचे व 116 गौराईंचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवासाठी शहरातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतले होते. पाच दिवस भक्तिभावाने गणरायाची आरती तसेच पूजा अर्चा करून शनिवारी त्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. कोणी डीजेच्या तालावर, कोणी खालुबाजाच्या तालावर तर कोणी टाळ ढोलकीच्या गजरात भजन गात बाप्पाची मिरवणूक काढली. विसर्जन मिरवणुकीमध्ये पावसाने आवर्जून हजेरी लावली होती.

शहरातील गणपतींचे मोदी तलाव, महादेव तलाव, पुसाटी तलाव या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. तसेच नगरपंचायतीकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. त्यालादेखील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मूर्तीचे विसर्जन केले व देवाचे निर्माल्य कलशामध्ये सोडले. यावेळी होमगार्ड, पोलीस यंत्रणांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विसर्जन मिरवणुकांवर लक्ष ठेवून होते. विसर्जन स्थळी आरत्या झाल्यावर रात्री उशिरापर्यंत अतिशय शांततेत बाप्पाचं विसर्जन पार पडले.
मोहोपाड्यात गणरायाला भावपूर्ण निरोप
पाच दिवसांचा पाहुणा असलेल्या गणपती बाप्पा आणि गौरींना शनिवारी सायंकाळी निरोप देण्यात आला. रसायनी पाताळगंगा परिसरातील गौरी गणपतींना मोहोपाडा तलाव, रिस पूल, कांबे पूल, पाताळगंगा नदी, रसेश्वर घाट, वावेघर घाट, तळेगाव बारवई पूल, गुळसुंदे घाट, कासप, चावणे घाट, वाशिवली गणेश घाट आदी ठिकाणी बाप्पाचे विसर्जन पार पडले.

यावेळी रसायनी परिसरातील जवळपास 2292 घरगुती गणेश बाप्पाचे तसेच 410 गौराईंला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
माणगावात गणरायांचे उत्साहात विसर्जन
माणगावसह तालुक्यातील 2 सार्वजनिक, 5451 खाजगी घरगुती गणपतींचे तसेच 1298 गौरींचे काळ व गोद नदीच्या पात्रातून तसेच तलावातून उत्साहात विसर्जन करण्यात आले. यावेळी माणगाव पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माणगाव येथील काळ नदी ठिकाणच्या गणपती विसर्जन घाटाजवळ नगरपंचायतीचे कामगार गणरायाचे विसर्जन करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले होते. तसेच साळुंके रेस्क्यू टीम यावेळी काळ नदी पात्रात तैनात ठेवण्यात आली होती. विसर्जन ठिकाणी माणगाव नागरपंचायतीतर्फे गणेश भक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव अंतर्गत कृत्रिम विसर्जन तलावाचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करा, माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत निर्माल्य येथे टाकावे, असा संदेश नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी संतोष माळी व कर्मचारी वृंद यांच्यातर्फे देण्यात आला होता. अत्यंत उत्साही वातावरणात व शांततेत माणगाव तालुक्यात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
बोर्लीपंचतनमध्ये एकत्रित मिरवणुकीने विसर्जनाला उत्साह
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे मोठ्या उत्साही आणि भक्तीपूर्ण वातावरणात शनिवारी पाचव्या दिवशी वाजतगाजत गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा श्री गणेशपेठ मंडळातील एकत्रित निघालेल्या विसर्जन मिरवणुकीमुळे शहराचा वेगळा दिमाख दिसत होता. बोर्लीपंचतन परीसरात परंपरेनुसार गावागावात प्रत्येक खोतीच्या नावाने ओळख आहे. येथे पूर्वापार सुरू झालेल्या मिरवणुकीची जय्यत तयारी यावर्षी करण्यात आली. विशेषतः गणेशपेठ खोतीतील शंभरहून अधिक कुटुंबांनी एकत्रित येऊन गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याचा नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे या मिरवणुकीतून एकात्मतेचा संदेश मिळाला आहे.
