जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना पाच सुवर्ण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वॉरक्लॉ येथे सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विुगणित करताना पाच सुवर्णपदकांवर नाव कोरले. रविवारी भारताच्या रिकर्व्ह संघांनी एकूण आठ पदकांची कमाई केली. पुरुषांच्या 18 वर्षांखालील कॅडेट गटात अमित कुमार, विकी रुहाल आणि बिशाल चेंगमय यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने फ्रान्सवर 5-3 अशी मात केली. तर, मिश्र दुहेरीतील अंतिम फेरीत कोमलिका बारी आणि पार्थ साळुंखे यांच्या जोडीने जपानच्या जोडीवर 6-2 असा विजय मिळवला. त्याशिवाय 21 वर्षांखालील गटात पार्थ साळुंखे, आदित्य चौधरी आणि धीरज बोमादेवारा या भारतीय रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या कॅडेट गटात भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

कंपाऊंड आणि रिकर्व्ह अशा दोन विभागांत खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण आठ सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली. भारताची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

Exit mobile version