| कर्जत | वार्ताहर |
कर्जत-पनवेल रेल्वे लाईन टाकल्यापासून या परिसरातील शंभरच्या वर कुटुंबांना दर पावसाळ्यात जीव मुठीत धरून राहावे लागते. पावसाळ्यात तीन-चार वेळा पाणी येत असल्याने या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. या परिसरातील पुराच्या पाण्याचा प्रश्न मध्य रेल्वे प्रशासनाने सोडविला नाही तर रेल्वेचे एकही नियोजित काम करू देणार नाही. प्रसंगी संपूर्ण तालुका आंदोलनात सहभागी होईल, असा इशारा आ. महेंद्र थोरवे यांनी उपस्थित रेल्वे अधिकार्यांना दिला. ज्ञानदीप वसाहतीतील महेंद्र देशमुख यांच्या निवासस्थानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. महेंद्र थोरवे, पंकज ओसवाल, किरवलीचे सरपंच संतोष सांबरी, माजी उपसरपंच बिपीन बडेकर, पंकज पाटील, नगरसेवक संकेत भासे, अनिल व्हजगे, राहुल वैद्य, केतन बोराडे, राजेश जाधव आदींसह रहिवासी उपस्थित होते.