नैसर्गिक नाल्यात बांधलेले बांधकाम हटवा; ग्रामस्थ आक्रमक
। नेरळ । वार्ताहर ।
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या महालक्ष्मी सोसायटी परिसरात नैसर्गिक नाले बांधकाम व्यवसायकाने बंद केल्याने येथे चारही बाजूला पाणी साचून पुरपरिस्थिचे स्वरूप दिसत आहे.तर असाच सतत पाऊस सुरू राहिल्यास येथील लोक वस्ती देखील पाण्याखाली येणार असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.याबाबत सरपंच विरले यांनी नैसर्गिक नाल्यात बांधकाम करण्यात आल्याने ते हटवण्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याचे म्हंटले.
नेरळ पूर्व परिसरातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर बांधकाम विकासकांच्या माध्यमातून गृह प्रकल्प उभारली जात आहेत.महाराष्ट्र राज्य प्राधिकरण अंतर्गत ही विकास कामे येत आहेत.एकंदरीत विकास कामे होत असताना नैसर्गिक नाले बुजवली जात असल्याने भविष्याच्या दृष्टीकोनातून अधिकारी वर्ग तसेच विकासकाणे दूरदृष्टीकोन ठेवला गेला नसल्याने येथे पाणी साचून राहत आहे.ग्रामपंचायत हद्दीतील धामोते येथील श्री महालक्ष्मी पार्क या परिसरात नैसर्गिक नाल्यात अनधिकृत पणे बांधकामे करून बांधकाम व्यवसायकाने टोलेजंग इमारती बांधल्या आहेत.त्यामुळे आता पाण्याचा निचरा होत नसल्याने,मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाचे पाणी साचून परिसर पूर्ण पाण्याने भरलेला दिसत आहे,त्यामुळे येथील ग्रामस्थांनी भीती दर्शवली असून बाजूला लागूनच उल्हासनदी असल्याने पावसाळ्यात या नदीला पूर आल्यास हे पाणी देखील येथे येत असल्याने घरे पाण्याखाली जाऊन नागरिक अडकून पडणार आहेत.
दरम्यान ग्रामपंचायत स्थरावर मान्सून पूर्व नाले साफ केले गेले असल्याचे येथील सरपंच महेश विरले सांगत आहेत.तर बांधकाम व्यवसायकला बांधकाम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळत आहे परंतु प्रत्यक्ष दर्शी व्यवसायक नैसर्गिक नाले बुजवून हे काम करत असल्याने पाणी साचत आहे.तर अशी बांधकामे तोडण्यात यावी म्हणून आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून तक्रार केली असल्याचे विरले म्हणाले.