स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा

शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

| भाकरवड | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कुसुंबळे हद्दीतील चिखली गावचे रहिवासी, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे स्व. मोहन कृष्णा धुमाळ (गुरुजी) यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी रविवारी (दि. 31) सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भावपूर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेची सुरुवात स्वानंद कोठेकर यांनी केली. उपस्थित मान्यवरांनी स्व. धुमाळ गुरुजी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

स्व. मोहन धुमाळ गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही शिक्षण व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी आयुष्यभर जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. सामाजिक, शैक्षणिक अथवा अन्य कोणतेही काम असो, त्यांनी पक्षीय भेदभाव न करता प्रत्येक गरजवंताला मदतीचा हात दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हेमनाथ खरसांबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्व. मोहन धुमाळ गुरुजी हे या विभागातील खरे ‌‘किंगमेकर’ होते. कोणत्याही व्यक्तीचे काम असो, त्यांनी कधीही पक्ष विचारला नाही. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून सदैव तत्पर राहिले. त्यांच्या जाण्याने समाजजीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनिल ठाकूर, कौशिक महाराज तसेच अन्य वक्त्यांनीही गुरुजींच्या सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. त्यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रांत निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणार नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

चिखली गावातील अनेक तरुण आज शासकीय सेवेत कार्यरत असून, त्यामागे स्व. धुमाळ गुरुजी यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. भाई प्रभाकर पाटील आणि भाई जयंत पाटील यांच्या सहवासात राहून त्यांनी शेकापची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले होते. या शोकसभेस शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका सरचिटणीस नरेश म्हात्रे, विलास म्हात्रे, अमृत पाटील, स्वानंद कोठेकर, बाळकृष्ण पाटील, हेमनाथ खरसांबळे, सतीश तरे, जीवन निळकर, कौशिक पाटील, अनिल ठाकूर, राजन पाटील, विकास पाटील, निलेश चवरकर, दिगंबर म्हात्रे, आप्पा दांडेकर, चारुशीला धुमाळ यांच्यासह धुमाळ गुरुजींचे कुटुंबीय, शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अलिबाग तालुका सरचिटणीस नरेश म्हात्रे यांनी स्व. मोहन धुमाळ गुरुजी यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.के. पाटील यांनी केले.

Exit mobile version