| उरण | प्रतिनिधी |
मुंबई ही आगरी-कोळी यांची असताना आजच्या घडीला आगरी कोळी नावालाही उरले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तीच परिस्थिती नवी मुंबईत झालेली पहावयास मिळत आहे. त्याची पुनरावृत्ती आता रायगडमधील उरण तालुक्यात होताना दिसत आहे. त्याला वाढते औद्योगीकरण जरी जबाबदार असले तरी आपणही तेवढेच जबादार आहोत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तरी तालुक्यातील ग्रामपंचायतने यावर ठोस निर्बंध लावण्यासाठी पुढाकार घेऊन स्थानिकांना व्यवसाय क्षेत्रात उतरविण्यासाठी उपक्रम सुरू करणे काळाजी गरज बनली आहे. अन्यथा स्थानिक हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही.
उरण तालुक्यातील प्रत्येक गावात व शहरात परप्रांतीय लोकांचा व्यवसायाच्या निमित्ताने वावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पूर्वी गावागावात आपले स्थानिक व्यवसाय उद्योगधंदे करीत होते. ते नामशेष होऊन त्याजागी आता परप्रांतीयांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गावाचे रूप पालटून शहरीकरण होताना दिसत आहे. परंतु, त्यामध्ये आपला स्थानिक किती आहे. याचा विचार राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेतेमंडळीने करून त्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.
वाढत्या औद्योगिकारणामुळे उरणचा चेहरामोहरा बदलत चालला आहे. त्यामध्ये द्रोणागिरी नोडची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणात उंच इमारतींचे टॉवर उभे राहिले आहेत. त्यामध्ये व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने बाहेरील जनतेचा वावर वाढला आहे. त्यामध्ये आपला स्थानिक हरवत चालला आहे. ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यासाठी येणाऱ्या परप्रतियांची योग्य ती तपासणी होणे गरजेचे असतानाही तसे ग्रामपंचायतकडून होताना दिसत नाही. त्यातील अनेकजण गुन्हेगार प्रवृत्तीचे असल्याचे पोलीस कारवाई झाल्यानंतर उघड झाले आहे.
लवकरच प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा सामना करणे अवघड होणार आहे. त्या आधीच तालुक्यातील अनेक ठिकाणी आठवडा बाजार भरत आहे. त्यामध्ये त्यांची दहशत वाढू लागली आहे. हे टाळण्यासाठी याबाबतीत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आतापासूनच कडक नियम अंमलात आणण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी स्थानिकांनी नोकरीच्या मागे न लागता ज्याप्रमाणे परप्रांतीय आपले बस्तान बाहेरून येऊन आपल्या भागात निर्माण करतात. त्याप्रमाणे स्थानिकांनी व्यवसायात करणे गरजेचे बनले आहे. स्थानिकांनी ही कोणताही व्यवसाय मनापासून केला तर नक्कीच तो आपली प्रगती साधू शकतो. हे जर झाले तर नक्कीच परप्रतियांची मक्तेदारी मोडीत काढण्यात स्थानिकांना यश येईल.
तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतने गावा व्यतिरिक्त बाहेरील येणाऱ्या व्यक्तींची शहानिशा करण्यासाठी त्यांच्याकडील लेखी अधिकृत कागदपत्रे यांची तपासणी करून त्याची नोंद प्रत्येक ग्रामपंचायतने ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे जेणेकरून एखादी घटना घडली तरी संबंधित कागदपत्रावरून तपास करणे पोलिसांना सोपे होऊन अशा घटनांना आळा बसेल. जर याची योग्य ती खबरदारी ग्रामपंचायत व येथील जनतेने घेतली नाहीतर भविष्यात मुबंई व नवी मुबंई सारखी उरणची परिस्थिती होऊन स्थानिकांचे अस्तित्व संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही.
परप्रतियांची मक्तेदारी, स्थानिक हद्दपार
