महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला रवाना
| मुंबई | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांंना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ रविवारी (दि. 23) पॅरिसला रवाना झाले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत.
महाराष्ट्र शासनाने मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री अॅड. शेलार यांनी आभार मानले. या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत पॅरिस-फ्रान्स येथे गेले आहे. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौर्याद्वारे या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्त्व आणि जतन सुनिश्चित होईल, अशी आशा अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.