Rasayani Crime: प्रेमाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

रसायनीतील भामटा पोलिसांच्या जाळ्यात

| रसायनी | प्रतिनिधी |

सोशल मीडियासह मेट्रिमोनी साईटच्या माध्यमातून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रसायनीतील एका भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आदर्श म्हात्रे ऊर्फ रुद्रेश गोंधळी (34) रा. तुराडे, रसायनी असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेट्रिमोनी साईटवरून तरुणींशी संपर्क साधत असे. विश्वास संपादन करून लग्नाचे आणि प्रेमाचे आमिष दाखवत त्यांना कर्ज काढण्यास भाग पाडून लाखो रुपये उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पैसे मिळाल्यानंतर तो संपर्क तोडून फरार होत असे.

या आरोपीविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्यानंतरही त्याचे फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शंभरहून अधिक महिला व तरुणींना त्याने गंडा घातल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत 11 पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी दाखल केल्या आहेत. नवी मुंबईतील कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि मेट्रिमोनी संकेतस्थळांवर ओळख झालेल्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Exit mobile version