पूरग्रस्तांसाठी मोफत अन्नधान्य – छगन भुजबळ

मुंबई | प्रतिनिधी |
राज्य सरकारने पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी शासकीय नियमांनुसार या भागांमधल्या नागरिकांना मोफत धान्य आणि शिवभोजन थाळीचं वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यासाठी काही मूलभूत अटी घालण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे.
पावसामुळे आणि पुरामुळे लोकांची घरंदारं गेली. घरातलं सामान वाहून गेलं. अनेक लोकांना मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी जे क्षेत्र पाण्यात बुडालं असेल, घरं वाहून गेली असतील किंवा नुकसान झालं असेल, अशा निराधार कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भातला शासकीय आदेश मार्च 2019ला काढण्यात आला आहे. त्यात थोडा बदल करून ज्यांना गहू नको असेल, त्यांना तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात प्रामुख्याने भाताचा समावेश जेवणात असतो. त्यामुळे तांदूळ देखील पुरवले जातील. यासोबतच तिथे उपलब्ध असलेली किंवा लोकांच्या आहारात असलेली 5 किलो डाळ देखील पुरवण्याचा निर्णय झाला आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
दुप्पट शिवभोजन थाळी
पूरग्रस्त भागात शिवभोजन थाळीचं देखील रोजच्या मर्यादेपेक्षा दुप्पट संख्येने वाटप करावं असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या सहीचं पत्र देखील चालू शकेल. ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र देखील उद्ध्वस्त झाले आहेत, अशा ठिकाणी बाजूच्या जिल्हा किंवा तालुक्यातून शिवभोजन केंद्रातून जेवणाची पाकिटं आणून वितरीत करायची आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले.

Exit mobile version