Shrivardhan Power Cut Issue: श्रीवर्धन शहरात विजेचा खेळ खंडोबा

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये विजेचा खेळ खंडोबा सुरू असून, वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने पावसाळ्यापूर्वी अनेक वेळा संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा बंद ठेवून देखभाल व दुरुस्तीची कामे केली होती. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर देखभाल व दुरुस्तीची कामे करून सुद्धा पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे महावितरणच्या विजेचा खेळ खंडोबा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या भागामध्ये वीज वाहकतारा तुटणे, कंडक्टर तुटणे यासारखे प्रकार घडत आहेत. दोन दिवसापूर्वी चौकर पाखाडी येथून दांडे परिसराकडे जाणाऱ्या भूमिगत उच्च दाबाच्या विजवाहिन्या जळाल्यामुळे त्या ठिकाणचा वीज पुरवठा जवळजवळ दीड दिवस खंडित होता.

दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाने देखील दडी मारली आहे. त्यामुळे हवेमध्ये उष्म्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, वारंवार खंडित होत असलेला वीज पुरवठा त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कारण अनेकांचे इन्व्हर्टर बॅकअप देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे बंद पडत आहेत. महावितरणकडून बिले वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबविली जाते. तर आता नवीन स्मार्ट मीटर बसल्यामुळे वीज बिल भरणा वेळेवर न केल्यास वीज पुरवठा आपोआप बंद होतो. मात्र, वसुलीसाठी एवढे सगळे पर्याय महावितरणकडे उपलब्ध असताना ग्राहकांना मात्र सुरळीत वीज पुरवठा का पुरविला जात नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. श्रीवर्धन शहरातील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी नारळाची किंवा सुपारीची झाडे रस्त्यालगत असल्यामुळे त्याचे पान वायरवर पडल्यावर वीज पुरवठा खंडित होतो. परंतु, ज्या वेळेला खूप वारा व पाऊस असतो त्याच वेळेला अशा घटना घडत असतात. तरी महावितरणने आपला वीज पुरवठा सुरळीतपणे ग्राहकांना पुरवता येईल याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version