नागरिकांमधून तीव्र नाराजीचे सूर
। सुकेळी । वार्ताहर ।
गणेशोत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना वाकण नाका व आजुबाजूच्या असलेल्या गावांमध्ये महावितरणने विजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावाने या परिसरातील नागरिक अक्षरशः त्रासुन गेलेले आहेत. वीज पुरवठा खंडीत होण्याची कोणतीही ठराविक वेळ नसुन कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेस देखिल दहा-दहा मिनिटांनी किंवा दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. आठवड्यातून एक दिवस हा शटडाऊन साठी घेत असतानासुद्धा बाकीच्या दिवशी वीज पुरवठा खंडित करीत आहेत. वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे हाॅटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
वीज खंडित झाल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी कार्यालयाशी किंवा अधिकाऱ्यांबरोबर संपर्क केल्यास अनेकदा फोन बंद असतो, तर कधी रिंग वाजुनसद्धा फोन उचळण्यास टाळाटाळ करत असतात. अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे. वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी थोडा जरी उशीर झाल्यास वायरमन लगेचच वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देतात. तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होऊनही तेवढेच वीज बिल किंवा त्यापेक्षा जास्त बिल ग्राहकांना येत असते. नागरिक या वीज वितरणाच्या सुरू असलेल्या विजेच्या लंपडावाबाबतच्या कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. तसेच जवळच आलेल्या गणेशोत्सवापूर्वीच्या सणाच्या आधी वीजवितरणाने आपला कारभार सुधारावा व गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.