शेकापची विचारधारा तरुणांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
| पनवेल | भरतकुमार कांबळे |
तरुणाईला बदल हवा आहे आणि तो बदल घडविण्याची ताकद आपल्यात आहे. मात्र, त्यासाठी एकजुटीने लढायला तयार व्हा; काळ आपलाच आहे, असा जोशपूर्ण निर्धार शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला. जेन झीच्या आंदोलनातून मिळालेली ऊर्जा आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी तरुणाईशी जोडले जाण्याचे आवाहन केले.
पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवार, दि. 27 जुलै रोजी पक्षाच्या 79 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाची विचारधारा आणि कार्यप्रणाली सोशल मीडिया माध्यमातून तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाबद्दल आजही सर्वसामान्यांच्या मनात विश्वास आणि आपुलकी आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक आणि जेन झीच्या आंदोलकांची भेट घेतली असता, तेथील महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधींनी शेकापची स्वच्छ प्रतिमा आजही कायम असल्याचे सांगितले. ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. याच विश्वासाच्या बळावर तरुणांच्या मनाचा ठाव घेण्याची गरज आहे. जेन झीच्या आंदोलनाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली असून, त्यातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकजुटीने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शैलाताई पाटील, कामगार आघाडीचे नेते प्रदीप नाईक, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी, माजी सभापती नारायण घरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, शेकापचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, महानगर जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नारायण घरत यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सभेच्या समारोपावेळी प्रकाश म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पद नसले तरी जनतेसाठी काम करा : ॲड. मानसी म्हात्रे
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी पनवेल युनिटच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांची ताकद पनवेलमध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे, त्याचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा. पद नसतानाही जनतेची कामे कशी करून दाखवायची, हे पनवेलकरांनी सिद्ध केले आहे. पद नसल्याचा न्यूनगंड न बाळगता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. सध्या पक्षाची काहीशी पिछेहाट झाली असली तरी आगामी काळ आपलाच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेकाप हा लढवय्यांचा पक्ष : सुरेश खैरे
शेकापचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. शेतकरी कामगार पक्ष हा लढवय्यांचा पक्ष आहे. शेकापच्या बहाद्दर शिलेदारांनी कधीही पदाची लालसा धरली नाही. उलट, पदाला लाथ मारून जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी दाखवली. त्यामुळेच आजही सर्वसामान्य जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी सांगितले.
