जिल्ह्याचा निकाल 96.25 टक्के
। अलिबाग । प्रतिनिधी ।
बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्कंठा शिगेला पोहचली होती. अखेर ही उत्कंठा संपली आहे. मंगळवारी (दि.13) दुपारी एक वाजल्यापासून संपली आहे. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या परीक्षेत जिल्ह्याचा 96.25 टक्के निकाल लागला आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.26 टक्के, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.31 टक्के इतके आहे. यावर्षीदेखील दहावीच्या निकालात मुलींची सरशी कायम राहिली आहे. बारावीच्या निकालापाठोपाठ दहावीच्या निकालातही कोकणात रायगड जिल्हा अव्वल ठरल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेनंतर निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे डोळे लागून राहिले होते. दहावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेर सोमवारी शिक्षण विभागाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली.
मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. दहावीचा निकाल पाहण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. तर, काही विद्यार्थ्यांनी मोबाईलचा आधार घेत घरबसल्या निकाल पाहिला. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार्या दहावीचा निकाल पाहण्यामध्ये विद्यार्थी मग्न झाले होते. रायगड जिल्ह्यातून 35 हजार 612 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 394 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यामधील 34 हजार 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एक हजार 327 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
निकालात रोहा अव्वल
रायगड जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. रोहा तालुक्यातील 97.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये रोहा तालुक्याने निकाला बाजी मारली आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत रोहा तालुका निकालात अव्वल ठरल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
75.37 टक्के पुनर्परिक्षार्थी उत्तीर्ण
रायगड जिल्ह्यातील एक हजार 684 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. यापैकी एक हजार 645 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये एक हजार 240 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 75.37 टक्के इतके आहे. त्यात मुले 72.69 टक्के व मुली 80 टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत.
तालुकानिहाय निकाल
तालुका | एकूण टक्केवारी | |
पनवेल | 96.68 | |
उरण | 98.78 | |
कर्जत – 96.68 | 96.68 | |
खालापूर | 93.75 | |
सुधागड | 91.28 | |
पेण | 95.49 | |
अलिबाग | 96.76 | |
मुरूड | 96.19 | |
रोहा | 96.54 | |
माणगाव | 96.48 | |
तळा | 96.40 | |
श्रीवर्धन | 95.83 | |
म्हसळा | 95.53 | |
महाड | 97.07 | |
पोलादपूर | 95.07 | |
एकूण | 96.25 |