। उरण । वार्ताहर ।
उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या विविध मागण्या तातडीने सोडवून त्यांना योग्य तो मोबदला सरकारकडून मिळावा,अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी सरकारकडे केली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात प्रकल्पग्रस्तांनी आपले गार्हाणे सरकारकडे मागणी केली आहे.उपस्थित शेतकरी नवनीत भोईर,हेमदास गोवारी,सुरज पाटील,सुनील भोईर,सुनील पाटील ,महेश भोईर यांनी मुद्देसूदपणे आपली बाजू पालकमंत्र्या समोर मांडली.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात 2013 च्या केंद्राच्या भू संपादन कायद्याप्रमाणे बाधित शेतकर्यांना मोबदला मिळावा. भविष्यात काळाधोंडा रेल्वे स्टेशन कार्यालयात जी कामगारांची भरती होईल त्यात 100% भरती ही काळाधोंडा रेल्वे प्रकल्पग्रस्तांची करण्यात यावी. रेल्वेची कामे प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावीत.
हाऊसकिपींगच्या कामात रेल्वे प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे. रेल्वे स्थानक आवारातील व्यापारी दुकानें /गाळे ही सरकारी फी आकारून मालकी हक्काने किंवा भाडे तत्वावर सरकारी फी आकारून प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावे. बाधित शेतकर्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. सदर रेल्वे स्टेशनला उरण कोट हे नाव देण्यात यावे या विविध मागण्या संदर्भात आजतागायत साखळी उपोषण सुरु आहे.तरी अजूनही या शेतकर्यांना न्याय मिळालेले नाही.अजूनही शेतकर्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्यामुळे आता थेट रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनीच यात लक्ष घालावे अशी मागणी उरण तालुक्यातील काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जनता दरबारात केली आहे.