पालीत अरुंद रस्त्यामुऴे अपघाताची भीती
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
जोपर्यंत आपण आपली मागणी लावून धरणार नाही तोपर्यंत आपल्याला हक्काची जागा मिळणार नाही हे जाणून आता आदिवासी बांधव व भाजीपाला व्यवसायिक हक्काच्या भाजीमार्केटची मागणी करू लागलेत. शेजारील गावातील शेतकरी व प्रामुख्याने आदिवासी आपल्या शेतात व परसबागेत पिकविलेला भाजीपाला, फळे व फुले घेवून पालीत विकण्यासाठी नित्यनियमाने येतात. मात्र या हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांना पालीत व्यवसाय करण्यासाठी बसण्याची हक्काची जागा नाही. रस्याच्याकडेला जागा मिळेल तिथे हे विक्रेते आपला माल विकण्यासाठी बसतात. परिणामी त्यांची मोठी गैरसोय होते. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे रस्त्यावरील विक्रेते व ग्राहक यामुळे येणार्या जाणार्या वाहणांना व पादचार्यांना मार्ग काढणे देखिल अवघड होते आणि परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक जटिल बनतो. ज्याप्रमाणे सुधागड तालुक्यात मच्छीमार्केट व मटण मार्केट आहे, त्याप्रमाणे भाजी मार्केट देखील असावे अशी मागणी मागील अनेक वर्षे आदिवासी बांधव करीत आहेत, मात्र या मागणीकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे, पावसाळ्यात व इतर मोसमात रानभाज्या, कंदमुळे मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात, मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने आदिवासी बांधव जागा मिळेल तिथे बसतात परिणामी जागेअभावी व्यवसायाला फटका बसतो, भाजी नाशवन्त असल्याने वेळेत विक्री होत नाही व या भाजी विक्रेत्यांना मोठे नुकसान सोसावे लागते.
पालीत प्रामुख्याने बाजारपेठ, मिनिडोअर स्टँन्ड रस्ता ते पाली बस स्थानक, गांधी चौक, जुने एसटी स्टँड, मारुती मंदिर नाका व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फळभाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला विक्रिसाठी बसतात. रस्त्याच्या कडेला त्यांना पुरेशी जागा देखिल नसते. मात्र नाईलाजाने त्यांना तिथे बसावे लागते. प्रामुख्याने आदिवासी महिला सकाळी अगदी पहाटे लवकर उठूण गावाठी भाजीपाला, फुले, आंबे, काजुगर, कोकम, आंबे आणि रानमेावा यापैकी जे असेल ते टोपलीत टाकुन ती टोपली डोक्यावर घेवून पालीकडे यायला निघतात. स्थानिक मासेमार देखिल गोड्या पाण्यातील मच्छी विक्रिसाठी आणतात. यांना आदिवासीवाडी पाड्यावरुन मुख्य रस्त्यावर पायपीट करत यावे लागते. त्यानंतर भेटेल त्या गाडीत बसुन पालीत येतात. आणि रस्त्याच्या बाजुला आपला माल घेवून बसतात. रस्त्याच्या कडेला एखाद्या झाडाखाली, किंवा दुकानाच्या शेडखाली नाहितर मग मोकळ्या जागेत या महिला विक्रिसाठी ठाण मांडतात. तर काही जण हातगाडीवर आपला माल विकतात. सध्या उन्हाळा सुरु असल्याने या उन्हाचा खुप त्रास या विक्रेत्यांना होतो. पिण्याचे पाणी आणि खाण्यापिण्याची देखिल अबाळ असते. दैनंदिन विधी आटोपण्यासाठी देखिल त्यांची खुप परवड होते. अशा परिस्थितीत मग विक्रेते आणि ग्राहक यांची रस्त्याच्या बाजुला रेलचेल असते. त्यामूळे वाहतुकिवर परिणाम देखिल होतो. परिणामी या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे या विक्रेत्यांना शासनाकडुन हक्काची जागा देणे. जेणेकरुन नियमित हे विक्रेते त्या ठिकाणी बसुन आपला माल विकतील. या हक्काच्या जागेत एकाच ठिकाणी सर्व विक्रेते आल्याने ग्राहकांना देखिल तिथे जाणे सोप्पे होईल, त्यांना एका छताखालीच विविध वस्तू खरेदी करता येतील. त्याच बरोबर या विक्रेत्यांची देखिल वणवण आणि परवड थांबेल. त्यांची उत्पादने देखिल सुरक्षित राहतील. आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारे प्रश्न देखिल आपोआप मिटतील.
मोक्याची जागा हवी
पालीतील भाजी मार्केटची जागा फारशी मोठी नाही. तिथे काहि थोडेच विक्रेते बसतात. रस्त्यावर विक्री करणार्या फळभाजीपाला विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध करुन द्यायची असेल तर त्यासाठी मोकळी व मोक्याची जागा अवाश्यक आहे. शासकिय किंवा गावठाण जागेचा वापर यासाठी होऊ शकतो. मात्र त्यासाठी शासकिय व ग्रामपंचायतीची इच्छाशक्ती आणि त्याबरोबरच पुरेसा निधी आवश्यक आहे.