आ. जयंत पाटील यांची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
थळ, ता. अलिबाग येथील आरसीएफ खत कारखान्यातील 78 माथाडी कामगारांना कामगारांचा दर्जा दिला जावा, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. मंगळवारी या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आर.सी.एफ.मध्ये 78 माथाडी कामगार सन 1988 पासून काम करीत आहेत. 26 फेब्रुवारी 2009 रोजी या 78 माथाडी कामगारांना महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरी नियमन व कल्याण) अधिनियम 1969 च्या कलम 6 (1) अन्वये स्थापिलेले किराणा बाजार व दुकाने मंडळ, मुंबई यांच्याकडून बॅज देण्यात येणे आवश्यक होते.
परंतु, आजपर्यंत आरसीएफ कंपनीने या कामगारांचा भरावा लागणारा लेव्ही जमा केलेला नाही. कामगार कोकण आयुक्त, मुंबई व रायगड कामगार कोकण आयुक्त यांनी प्रत्यक्ष कंपनीत जाऊन सदर कामागांराच्या कामाची पाहणी व चौकशी करून सदरचे कामगार हे माथाडी कामगारांसारखेच काम करीत असल्याबाबतचा अहवाल देऊनसुद्धा सदरचा बॅज हा आरसीएफ व्यवस्थापनाला मान्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बॅजधारकाकडे असलेला बॅज हा त्याच्यानंतर त्याच्या वारसांकडे हस्तांतरीत होतो, अशी कायद्यात तरतूद आहे. लेव्ही न भरल्यामुळे हा बॅज रद्द होण्याची शक्यता असते व असे झाल्यास संबंधित कर्मचार्याचे आणि पर्यायाने त्यांच्या वारसाचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. शासनाने या प्रकारमध्ये लक्ष घालून आर.सी.एफ. व्यवस्थापनाला लेव्ही भरण्याचे निर्देशन देण्यात यावेत व संबंधित कामगारांचे बॅज नियमित करून त्यांना माथाडी कामगारांचा दर्जा देण्याबाबत सभागृहामध्ये 93 अन्वये सूचना द्यावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली. यावर सभापतींनी शासनास निवेदन करण्यास सांगितले.