45 वर्षे लाल फितीत अडकून
| नेरळ | प्रतिनिधी |
वन जमीन आणि भीमाशंकर अभयारण्य यांच्या जमिनीमुळे गेली 45 वर्षे लाल फितीत अडकलेल्या उरण पनवेल नेरळ शिरूर राज्यमार्गाचे नाव बदलून नव्याने या मार्गाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. रायगड ते पुणे-अहिल्यानगर रस्त्याला जोडणारा नवीन महामार्ग प्रस्तावित असून हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील कर्जत-नेरळ येथून सुरु होईल आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरुर येथे जोडला जाणार आहे.
भीमाशंकर घाट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते 2011 मध्ये झाले होते आणि आज एक तप लोटले तरी वन जमिनीची परवानगी मिळत नाही. कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर तब्बल पाच ठिकाणी 25-50 मिटर एवढे अंतर केवळ वन जमीन असल्याने शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या यंत्रणा यांना रस्ता करू दिला जात नाही.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सपेस वे यांच्यावर पडत असलेला वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उरण पनवेल नेरळ शिरूर असा राज्य मार्ग 1980 पासून प्रस्तावित होता. त्या राज्यमार्ग रस्त्याचे भीमशंक घाटातील कामाला 2011 मध्ये सुरुवात झाली होती. तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते घाटरस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला होता. मात्र घाटरस्त्यात जात असलेल्या वन जमिनीमधून रस्ता बनविण्यास आजतागात परवानगी मिळलेली नाही. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काम वन जमिनीमुळे अडकले होते. मात्र, आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबईचा होणारा विस्तार लक्षात घेऊन राज्य सरकार हा राज्यमार्ग बनविण्यासाठी आग्रही आहे.
रायगड ते पुणे-अहिल्यानगर रस्त्याला जोडणारा नवीन महामार्ग प्रस्तावित असून हा महामार्ग जिल्ह्यातील कर्जत-नेरळ येथून सुरु होईल आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरुरला जोडेल, ज्यामुळे राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वाहनांना सोयीस्कर मार्ग मिळेल. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मंजुरी आणि निधीच्या तरतुदींसाठी कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.







