शशिकांत जैतू यांचे कुटूंबिय देखील शेकापसोबत
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी शेकापवर जनतेचा विश्वास असल्याने पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. 15 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर निवडणूक होत असलेल्या नवेदर नवगाव ग्रामपंचायतीसाठी ग्रामस्थांनीही मोठया प्रमाणावर शेकापक्षाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे.
शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे नवगाव गावावर विशेष प्रेम असल्याने मोठया प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मच्छिमारांच्या समस्यांसाठी विधानपरिषदेत मोठया प्रमाणावर प्रश्न उपस्थित करणारे ते एकमेव आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याच कार्यप्रणालीवर नवगावकर ग्रामस्थ आणि विशेष करुन कोळी समाजाचा विश्वास आहे.
नवेदर नवगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर होताच अनेकांनी शेकापक्षालाच पसंती दिली आहे. यात सर्वसामान्य ग्रामस्थांसोबत उच्चशिक्षित तसेच उच्चपदस्थांचा देखील समावेश आहे. माजी उपजिल्हाधिकारी प्रेमलता जैतू तसेच एअर इंडियामध्ये उच्चपदावरुन निवृत्त झालेले शशिकांत जैतू यांची पूर्वीपासून शेकापक्षावर निष्ठा आहे. त्यांनी या निवडणुकीत शेकापला गावाच्या विकासासाठी सक्रीय मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमलता जैतु या स्वतः उच्च पदस्थ आणि अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्र असलेल्या उमेदवार आहेत. त्यांनी अंकिता जैतु या शेकापच्या तरुण आणि पदवीधर अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला सरपंचपदासाठी पसंती दर्शवून स्वतः सदस्य म्हणून निवडणूक लढवीत आहेत. प्रेमलता जैतु या मूळच्या अलिबाग तालुक्यातील म्हात्रोली या गावातील असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.
ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी त्यांची ही कामगिरी आदर्शवत असून कुटुंबाकडे शिक्षणासाठी पैसे नसताना स्वतः मेहनत घेऊन प्रसंगी उपाशीपोटी राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून उपजिल्हाधिकारी पदापर्यंत प्रशासनात निस्वार्थी भावनेने काम केले आणि त्यांनतर याची जाणीव त्यांनी स्वतः ठेवून ग्रामीण भागातील अनेक समस्यांना सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनात काम केले.
प्रेमलता जैतु आणि शशिकांत जैतु यांनी आजवर नवगाव गावातील 40 पेक्षा अधिक कुटुंबातील तरुणांना रोजगार मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध करून दिला आहे. तसेच वैद्यकीय उपचार, शैक्षणिक मदत, सामाजिक उपक्रमात आर्थिक योगदान असे मोठे काम त्यांनी निस्वार्थी भावनेने गावासाठी केलेले आहे. नवगाव गाव धार्मिक कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध असून त्यामध्ये स्वतः शशिकांत जैतु पुढाकार घेऊन कार्यरत असतात. ज्यामध्ये आर्थिक असो वा सामाजिक सर्व मदत करण्यास ते तन्मयतेने काम करतात.
गावामध्ये माझी कोणतीही मालमत्ता नसून येथील लोक हीच माझी मोठी संपत्ती आहे, असे शशिकांत जैतु अभिमानाने सांगतात. त्यामुळे जैतु कुटुंबातील या दाम्पत्यावर नवगावकरांचे विशेष प्रेम राहिले आहे. यापुढे देखील आपण गावातील समस्यांना थेट भिडून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राजकारणात येत आहोत, असे त्यांनी सांगितले.
रायगड जिल्हयाचा विकास फक्त आणि फक्त शेकापक्षच करु शकतो. आ. जयंत पाटील यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. कोळी समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सक्रीय पाठिंबा देत शेकापक्षाच्या विजयासाठी जिवाचे रान करु .
शशिकांत जैतू
शेकाप नेते