हरिहरेश्‍वर पर्यटकांनी गजबजले

। पाली/गोमाशी । वर्ताहर ।

रायगड जिल्ह्यातल श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्‍वर मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हरिहरेश्‍वर हे निसर्गाच्या मध्यभागी सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेले आहे. प्रमुख तीर्थक्षेत्राव्यतिरिक्त हरिहरेश्‍वर हे दोन समुद्रकिनारे असलेले एक लोकप्रिय बीच रिसॉर्ट आहे. एक समुद्रकिनारा उत्तरेला आहे. तर, दुसरा किनारा मंदिराच्या दक्षिणेला असून त्याला ‘देवभूमी’ किंवा ‘दक्षिण काशी’ असे म्हटले जाते.

हरिहरेश्‍वर मंदिरासमोर सुमारे 2.4 किमी लांबीचा सरळ समुद्रकिनारा असून दुसरा समुद्रकिनारा एमटीडीसी रिसॉर्टच्या अगदी समोर सुमारे 2 किमी लांबीचा आहे. दक्षिण समुद्रकिनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट आहे. हरिहरेश्‍वर समुद्र किनार्‍यासह श्रीवर्धन आणि दिवेआगर समुद्र किनारे हे पुणे (190 किमी) आणि मुंबई (210 किमी) कडून येणार्‍या पर्यटकांचे एक लोकप्रिय ‘वीकेंड बीच डेस्टिनेशन’ बनले आहे. तसेच, एमटीडीसी आणि काही खाजगी रिसॉर्ट्स मुळे हरिहरेश्‍वरमध्ये राहण्यास कोणतीही अडचण उद्भवत नाही. दरम्यान, हरिहरेश्‍वर समुद्र किनार्‍यावर शनिवार-रविवार असल्यामुळे तसेच शैक्षणिक सहलीने किनारे पर्यटकांनी बहरले होते. हरिहरेश्‍वर हे सदाहरित ठिकाण असल्याने बाराही महिने पर्यटक येथे भेट देत असतात.

हरिहरेश्‍वर या तीर्थक्षेत्री विकेंडला पर्यटक, भाविक, शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणावर येत असतात. भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तसेच प्रसाद, हार, फुले, नारळ, खेळणी, पापड लोणचे व विविध वस्तूंची खरेदी देखील मोठ्या प्रमाणवर करत आहेत. हॉटेलमध्ये देखील जात असल्यामुळे सर्वांचा व्यवसाय काहीसा तेजीत होत आहे.

दिलीप गुरव,
दुकानदार
Exit mobile version