विश्‍वचषक जिंकण्याचा हरमनप्रीतला विश्‍वास

ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी सज्ज

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

‘आयसीसी’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज झाला असून ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याची आमच्याकडे आता सर्वोत्तम संधी असल्याचे मत कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. तसेच जेतेपद मिळवायचे झाल्यास बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करावा लागू शकेल याची हरमनप्रीतला जाण असली, तरी त्यांचे आव्हान परतवून लावण्याची क्षमता आमच्या संघात असल्याचा विश्‍वास तिने व्यक्त केला.

संयुक्त अरब अमिराती येथे 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ मंगळवारी मुंबईहून रवाना झाला. त्यापूर्वी मुंबईतच विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरमनप्रीतसह महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि निवड समितीच्या अध्यक्ष नीतू डेव्हिड उपस्थित होत्या. महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाला 2009 पासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून भारतीय संघ केवळ एकदाच अंतिम फेरी गाठू शकला आहे. 2020 च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी हरमनप्रीतच भारतीय संघाची कर्णधार होती. तसेच 2017च्या एकदिवसीय विश्‍वचषकात अंतिम फेरीत हार पत्करणार्‍या भारतीय संघातही हरमनप्रीतचा समावेश होता. आता या कटू आठवणी पुसून टाकण्यासाठी हरमनप्रीत सज्ज झाली आहे. ”आम्ही आता सर्वोत्तम संघासह विश्‍वचषकात उतरणार आहोत. या संघातील खेळाडू बर्‍याच काळापासून एकत्रित खेळत आहेत. त्यामुळे आम्हाला एकमेकांची ताकद आणि कच्चे दुवे ठाऊक आहेत. हे आमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. गेल्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषकात (2023 मध्ये) आम्ही उपांत्य फेरी गाठली होती, पण जेतेपदापासून दूरच राहिलो. यंदा आमच्याकडे विश्‍वविजेते होण्याची सर्वोत्तम संधी आहे. यापूर्वीच्या स्पर्धांच्या तुलनेत यंदा आमची तयारी अधिक चांगली झाली आहे. आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर काम केले आहे. त्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळेल अशी खात्री वाटते,” असे हरमनप्रीतने सांगितले.

जुलैमध्ये श्रीलंका येथे झालेल्या आशिया चषकात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भारतीय महिला संघाने स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाच्यादृष्टीने महिला संघाचे बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव शिबीर झाले. यात खेळाडूंची तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षण यावर विशेष मेहनत घेण्यात आली. ‘आशिया चषकात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. मात्र, एखाद्या दिवशी काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा होत नाहीत. तेच आमच्याबाबतीत अंतिम फेरीत घडले. त्यानंतर आम्ही बर्‍याच गोष्टींबाबत चर्चा केली. खेळातील उणिवा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता विश्‍वचषकात आम्ही सर्वोत्तम खेळ करू आणि जेतेपद पटकावू अशी आशा आहे,’ असे हरमनप्रीतने नमूद केले. फलंदाजांवर पूर्ण विश्‍वास मुझुमदारआपली भूमिका चोख बजावण्याची क्षमता असलेल्या भारतीय संघातील फलंदाजांवर माझा पूर्ण विश्‍वास असल्याचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले. ‘आमच्या अव्वल सहा फलंदाज फार प्रतिभावान आहेत. त्यांच्या फलंदाजीच्या शैलीत विविधता आहे. ही बाब आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तिसर्‍या क्रमांकावरील फलंदाजाची भूमिका सर्वांत महत्त्वाची असल्याचे मी मानतो. या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हे मला ठाऊक आहे. मात्र, आम्ही सामन्याच्या दिवशीच याचा खुलासा करू,’ असे मुझुमदार यांनी सांगितले. तसेच दुबई येथील खेळट्ट्यांकडून चेंडूला अधिक उसळी मिळेल. यासाठी आम्ही तयार असायला हवे, असेही मुझुमदार म्हणाले.

Exit mobile version