अनेक नौका किनार्यावर, रोजची करोडो रुपयांची उलाढाल थांबली
। हर्णै । वृत्तसंस्था ।
गेले पाच ते सहा दिवस मुसळधार पाऊस, वादळसदृश्य परिस्थितीमुळे हर्णै बंदरातील मासेमारी ठप्प झाली आहे. अजूनही दोन ते तीन दिवस वादळसदृश परिस्थितीचा धोका असल्याने मच्छीमार धास्तावले आहेत. त्यामुळे रोजची करोडो रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. अजून किती दिवस हे असंच वातावरण राहणार, अशी चिंता मच्छीमारांना लागली आहे.
वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांनी नौका जयगड, आंजर्ले आणि दाभोळ खाडीत आसर्याला हलवल्या. ओहोटीमुळे आंजर्ले खाडीत जात येत नव्हते. त्यामुळे 11 मासेमारी नौकांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा आडोसा घेतला, तर किमान चार ते पाच नौकांनी फत्तेगड किल्ल्याचा आसरा घेतला. वातावरण थोडे शांत झाल्यावर आणि भरतीच्या वेळेस आंजर्ले खाडीत जाता येईल. तसेच येथील वादळ थांबल्याशिवाय पुन्हा मच्छीमार समुद्रात मासेमारीला जाणार नाही, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. पर्यटकांना फिरवणार्या छोट्या नौकांनीही फत्तेगड किल्ल्याचाच आडोसा घेतला आहे. जोरदार वार्यापासून सुरक्षित राहण्यासाठी मच्छीमारांची धावपळ उडाली आहे.
या बिघडलेल्या वातावरणामुळे अजूनही कोणी समुद्रमध्ये मासेमारी करत असेल तर त्याने जवळपास असलेल्या खाडीत जावे, असे नौकामालक आपापल्या नौकांवरील नौकाचालकांना सांगत होते. वादळामुळे ठप्प झालेल्या मासेमारीमुळे बंदरातील सर्वच उद्योग ठप्प झाले आहेत. नाश्ताचे हातगाडीवाले, बैलगाडी, रिक्षाटेम्पो, इतर तीनचाकी आणि चारचाकी वाहने, बर्फ कारखाने, सर्व प्रकारचे, दुकानदार हवालदिल झाले आहेत. या वातावरणामुळे हर्णै बंदरातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.