आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल
| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयच्या आशिया चषकातील पाकिस्तानशी खेळण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रीय हिताला धोका निर्माण करतो, असे म्हटले आहे. तसेच, बीसीसीआय देशापेक्षा मोठे झाले का? पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंनी थेट केंद्र सरकारलाच सुनावले आहे.
पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले होत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकात पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी भारतीय संघ पाठवल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता याच संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे त्यांनी दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर बीसीसीआयची भूमिका आणि राष्ट्रीय हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
दशकात आपल्या देशाला आणि नागरिकांना पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना वारंवार तोंड द्यावे लागले आहे. अलीकडेच माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’ असे म्हटले असतानाही, दुर्दैवाने, बीसीसीआय आशिया चषकात पाकिस्तानशी खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. या कृतीमुळे असा प्रश्न निर्माण होतो की, बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा आणि आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसेच, भूतकाळात अनेक राष्ट्रांनी मानवतेच्या भल्यासाठी खेळांमध्ये सहभाग घेतला नाही. दहशतवाद हा एक असाच मुद्दा आहे जो दोन्ही देशांना शांततेत प्रगती करू देत नाही. तरीही, केवळ पैशाच्या आणि जाहिरातींच्या हव्यासापायी बीसीसीआय आपल्या जवानांचे बलिदान आणि जीवन नगण्य मानते, असा आरोपही आदीत्य ठाकरे यांनी या पत्राद्वारे केला आहे. आम्ही जगाला शिष्टमंडळे पाठवून पहलघमच्या मागे पाकिस्तान आहे, असे सांगितले.
आता आम्ही जगाला शिष्टमंडळे पाठवून, आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळत आहोत, याचे समर्थन करणार का? असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
पाकिस्तानने भारतातील खेळाडूंना वारंवार धमक्या दिलेल्या असताना, बीसीसीआयने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पाकिस्तानसोबत सामने खेळणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. मला आशा आहे की, जरी आपण राजकारणात वेगवेगळ्या बाजूने असलो तरी, या विचारावर आपण एकत्र येऊ. ज्याप्रमाणे आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’साठी आपल्या माननीय पंतप्रधानांना पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे आपण या प्रश्नावरही एकत्रितपणे पुढे जाऊ, असे आदित्य ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.
पैशाच्या लोभापायी पाकिस्तानसोबत सामने
गेल्या अनेक वर्षांपासून देशातील नागरिक आणि सैन्याने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले वारंवार सहन केले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडली आहे. नुकतेच, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सांगितले की, आता पाणी आणि रक्त दोन्ही एकत्र वाहू शकत नाहीत. तरीही, दुर्दैवाने बीसीसीआय आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी एक संघ पाठवत आहे. केवळ बीसीसीआयच्या हट्टामुळे, पैशाच्या लोभापायी, आपल्या जवानांच्या बलिदानाला कमी लेखले जात आहे. आम्ही जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवून पाकिस्तानची दहशतवादी बाजू उघड करत आहोत. आता आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असल्याबद्दल जगभरात आपली बाजू कशी योग्य ठरवणार?







