पावसाळ्यात मिळणारी आरोग्यवर्धक ‘शिंद’

आदिवासी महिलांना रोजगाराचे साधन

। पालघर । प्रतिनिधी ।

पावसाळ्यात मिळणारी बांबूची ‘शिंद’ ही रानभाजी सध्या बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी-शेतकरी महिला आठवडी बाजारात तसेच दारोदार शिंद विकून रोजगार मिळवत आहेत.

पावसाची रिपरिप सुरू झाली की अनेक रानभाज्या बाजारात डोकावू लागतात. यापैकी सप्टेंबर महिन्यात येणारी रानभाजी म्हणजे बांबूच्या कोंबापासून बनवलेले शिंद सध्या बाजारात विक्रीसाठी दाखल झालेले आहे. या शिंदच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले आवडीने ही भाजी विकत घेत आहेत. बांबूला साधारण श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात कोंब येतात. हे नवीन बांबू रुजून जमिनीतून वर येतात तेव्हा ते कोवळे असतात. या कोंबाला पातळ काप दिल्यानंतर शिंद तयार होते.

बांबू ही खूपच तंतूमय आणि क्षारयुक्त वनस्पती आहे. यात जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ, तंतुमय पदार्थ, अ‍ॅन्टीऑक्सिडेंट तसेच विविध पोषक घटक असल्याचे सांगण्यात येते. वर्षातून एकदा मिळणारी ही रानभाजी कोणत्याही मेहनती शिवाय आपोआप उगवत असते. यामुळे खर्‍या अर्थाने वर्षातून एकदाच येणारे हे सेंद्रिय अन्नच होय. अशी अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म असलेली शिंद म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच आहे. त्यामुळे सध्या अनेक खवय्ये हि रानभाजी विकत घेऊन याचा आस्वाद घेत आहेत.

शिंद बनवण्याची प्रक्रिया
बांबूचे शिंद बनवण्यासाठी आदल्या रात्री बाबूंच्या वरील टनक आवरणे काढून टाकली जातात व आतला कोवळा भाग काढून तो पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून मिठाच्या पाण्यात ठेवला जातो. या प्रक्रियेत त्याला असणारा उग्र वास कमी होतो व मऊदेखील होतो. वरील मऊ भाग कापून त्याचे लहान-लहान तुकडे एका भांड्यात झाकून ठेवले जातात. अशा पद्धतीने दुसर्‍या दिवशी हे शिंद भाजी करण्यासाठी तयार असतात.
वेगवेगळे पदार्थ
राज्यात वेगवेगळ्या भागात या रानभाजीपासून खोरीसा, वास्ता, बांबूचे लोणचे अशे वेगवेगळे प्रकार करतात. पालघर जिल्ह्यातील वसई, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधव या बांबूच्या शिंद सोबतच बांबूचे लोणचेदेखील तयार करतात. अनेकजण यात मीठ व हळद लावून ठेवतात. कोरडे झाल्यानंतर हे मिश्रण गोठते. त्याला ‘कोरडा खोरिसा’ असे म्हणतात. वाळलेल्या खोरिसाचा लोक वर्षभर वापर करतात. यात मासे घालून विविध पदार्थ बनवले जातात.

शहरी भागात या बांबूच्या शिंदला चांगली मागणी असल्याने भरलेली टोपली घेऊन कित्येक किलोमीटरचा प्रवास करून आम्ही विक्रीसाठी शहरात येतो. या टोपलीत 40-50 वाटे आहेत. त्यानुसार दिवसभरात 900 ते 1000 रुपये मिळतात. मात्र, मोबदल्याच्या तुलनेत मेहनत अधिक घ्यावी लागते.

– आदिवासी महिला विक्रेती, सकवार

Exit mobile version