| खालापूर | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसत असून, नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील घोडीवली येथे एका जुन्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना दशरथ पिंगळे यांच्या घराची भिंत सोमवारी (दि.3) अचानक कोसळली. घटना घडली त्यावेळी घरात दोन लहान मुले होती. मोठा आवाज झाल्याने दोन्ही मुले तत्काळ घराबाहेर धावत आल्याने संभाव्य अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच शेजारी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले. भिंत कोसळल्यामुळे घरातील धान्य, कपडे, भांडी, फर्निचर तसेच अन्य संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे घराचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असून आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर नुकसानग्रस्त कुटुंबाने शासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महसूल प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक जुनी व जीर्ण घरे धोकादायक बनली आहेत. अशा घरांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.







