| उरण | वार्ताहर |
वाहतूक कोंडीची समस्या निर्माण असल्याने दिघोडे-दास्तान मार्गावर संबंधित प्रशासनाने बंद करण्यात आलेली अवजड वाहतूक पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन डोळेझाकपणा करत आहे की काय, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
उरण तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने अवजड वाहनांची संख्याही तेवढ्याच प्रमाणात वाढत आहे. वेश्वी, चिर्ले, दिघोडे, विंधणे, चिरनेर, मोठी जुई, कळंबुसरे परिसरात सीएफएस आणि रिकामी कंटेनर यार्ड गोदामे यांच्या वाढत्या संख्येमुळे अवजड वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. अवजड वाहनांमुळे रस्तेही अपुरे पडू लागले आहेत. अवजड वाहनांची मुजोरीही वाढली आहे.
अवजड वाहनांच्या वाढत्या मुजोरीमुळे दिघोडे सर्कल आणि दिघोडे चिर्ले मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका हा सर्वसामान्य जनतेसह विद्यार्थी, नोकरदारवर्गालाही बसत असून, तासन्तास वाहतूक कोंडीमध्ये ताटकळत राहावे लागत आहे. मात्र, असे असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदरच्या अवजड वाहतुकीस आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवासी जनतेतून होत आहे.