नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच

बंदी आदेश धाब्यावर; जिल्हाधिकाऱ्यांचा धाक संपला? प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

धोकादायक घोषित करण्यात आलेल्या पुलांवरून अवजड वाहतुकीस स्पष्ट बंदी असतानाही अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली पुलावरून सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच उघडपणे हरताळ फासला जात असून, प्रशासनाचा धाकच राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विजना कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रा.लि. या संस्थेमार्फत अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे तसेच भाकरवड-देहेन या मार्गांवरील एकूण आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या तपासणीत संबंधित पूल आणि स्लॅब कलवर्टची भार क्षमता केवळ 5 ते 16 टन इतकी मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर हे पूल संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात या आठही पुलांवरून अवजड वाहनांना तात्काळ बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. या यादीत नवेदर बेली पुलाचाही समावेश आहे.

अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदी लागू करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे उलट दिसत आहे. काही खासगी ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहने या धोकादायक पुलावरून निर्धास्तपणे वाहतूक करत आहेत.

प्रशासनाच्या आदेशाची उघडपणे पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे. अवजड वाहतूक रोखण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा प्रभावच संपल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अद्याप केवळ कागदोपत्री आदेश आणि आश्वासनांवरच प्रशासनाची गाडी अडलेली दिसत असून, प्रत्यक्षात धोकादायक पुलावरून सुरू असलेली अवजड वाहतूक मोठ्या दुर्घटनेचे आमंत्रण देत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास याची गंभीर किंमत मोजावी लागू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

फलक गायब; खर्च वाया?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणी बंदी दर्शवणारे फलक उभारले होते. मात्र, सुरुवातीपासूनच हे फलक वाहनचालकांना स्पष्टपणे दिसत नसल्याची तक्रार होती. आता तर या ठिकाणचे फलक पूर्णपणे गायब झाले असल्याचे समोर आले आहे. फलकांवर झालेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याची टीका होत असून, या प्रकारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर अवजड वाहतुकीस बंदी असल्याचे स्पष्ट करणारे फलक लावणे आवश्यक आहे. याबाबत विभागाला सूचना दिल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बंदी असतानाही वाहतूक सुरू असल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाईल.

सरिता चव्हाण,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड

आक्षी-बेलकडे फाटा मार्गावरील नवेदर बेली पुलावर अवजड वाहनांना बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. जर सूचना फलक नसतील, तर तात्काळ ते लावून वाहतूक बंद करण्याची कार्यवाही केली जाईल.

मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग
Exit mobile version