बंदी असतानाही जेएसडब्ल्यूच्या बस पुलावरून सुरुच
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली येथील पूल अवजड वाहतुकीस धोकादायक असल्याने या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदीच्या आदेशाला झुगारून या पुलावरून जेएसडब्ल्यू कंपनीची अवजड वाहनांची वर्दळ सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळ धोकादायक पुलाला अवजड अशी परिस्थिती असतानाही प्रशासन मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसून आले आहे. नागरी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय फक्त जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापुरता सीमित असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.
अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे व भाकरवड-देहेन या मार्गांवरील आठ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट विजना कन्स्लटींग इंजिनिअरिंग प्रा.लि. या संस्थेमार्फत करण्यात आले. त्यामध्ये अलिबाग-रोहा मार्गावरील रामराज पूल, नवघर पूल, सुडकोली पूल, स्लॅब कलवर्ट, (पाण्याच्या अडथळ्यावर ठेवलेला सपाट आणि काँक्रिटचा बनवलेला भाग), अलिबाग-रेवदंडा मार्गावरील सहाण पूल, नवेदर बेली पूल, भाकरवड-देहन रस्त्यावरील देहेन पूल या पुलांचा समावेश आहे. या पुलांची व स्लॅब कलवर्टची रस्त्यावरील भारक्षमता पाच ते 16 टन असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवरील पूल व स्लॅब कलवर्ट संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या आठ धोकादायक पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्काळ बंदी घालणारा आदेश जारी केला.
पूल अधिक असुरक्षित झाल्याने वाहनचालकांनी व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. अपघात टाळण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आली असल्याचे लेखी आदेश काढले होते. नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लेखी पत्र काढले होते. मात्र, अलिबाग-रोहा मार्गावरील नवघर, सुडकोली येथील धोकादायक पुलांवरून काही खासगी ट्रक, डंपरसारखी अवजड वाहने बिनधास्तपणे धावत आहे. अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नवेदर बेली येथील पुलावरून जेएसडब्ल्यू कंपनीच्या वाहनांचीदेखील वर्दळ कायमच असते. जिल्हाधिकारी जावळे यांच्या आदेशाची पायमल्ली काही खासगी व कंपनीतील वाहन चालकांकडून होत आहे. याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला झुगारून या पुलांवरून अवजड वाहतूक होत असताना, प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. नागरी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
बंदीचे आदेश असलेल्या पुलावरून अवजड वाहतूक होत असल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल. त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील.
आंचल दलाल,
पोलीस अधीक्षक, रायगड







