मतदान वाढविण्यासाठी सदिच्छादूतांची मदत

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रांतील नामवंतांची मदत घेण्यात येणार आहे. त्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेते प्रशांत दामले, महिला क्रिकेटपटू स्मृती मनधना आदी 16 मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

राज्यात विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरी भागांतील मतदानाची घटती टक्केवारी ही निवडणूक आयोगासाठी चिंतेची बाब आहे. यंदाही मतदान कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार मतदार जनजागृतीसाठी आयोगाने विविध क्षेत्रातील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली आहे. समाजमाध्यमे, मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरातफलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

Exit mobile version