| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना एकदिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावरुन माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली.
यावरुनच विधानसभेत वाद झाला. माफीची मागणी करणारे नाना पटोले थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन उभे राहीले आणि त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. विरोधी पक्षाचे इतर आमदार यावेळी घोषणाबाजी करत होते. या गदारोळामुळे सदनाचे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले होते. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा गदारोळ झाला आणि नाना पटोले पुन्हा एकदा अध्यक्षांसमोर जाऊन उभे राहीले, यामुळे त्यांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले.
भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावरुन विधानसभेत राडा झाला. शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली. शेतकऱ्यांचा बाप मोदी नाही, तुमचा बाप असेल.. असं म्हणत नाना पटोले आक्रमक झाले होते. या सगळ्या गोंधळाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, अध्यक्षांवर धावून जाणे हे मी पहिल्यांदाच पाहीले आहे, ही पद्धत योग्य नाही. नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष राहीले आहेत. अशा व्यक्तीने अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे योग्य नाही. नानाभाऊंनी माफी मागितली पाहीजे.
नाना पटोले अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यास काय कारवाई करावी, यासंदर्भातील रुलिंग देण्यात आले होते. त्यामुळे नानाभाऊ मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी मजबूर करू नका. जागेवर बसा अथवा कामकाज सुरू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करावी लागेल. अध्यक्ष बोलायला उभे राहीले असताना असे वागणे तुम्हाला शोभत असेल तर मला पुढे काही म्हणायचे नाही, असं म्हणत नाना पटोलेंचे एका दिवसासाठी निलंबन करत असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले.






