मराठा आरक्षणातही पालकमंत्रीपदाचा विषय चर्चेत
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राजधानी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाच दिवस उलटून गेले आहेत. सर्वत्र मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. मात्र, अशा गंभीर विषयातही आ. भरत गोगावले यांनी केलेल्या पालकमंत्रीपदाच्या टिप्पणीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अनेक कामे रखडली आहेत. आज ना उद्या हा तिढा सुटेल, अशी रायगडकरांना अपेक्षा आहे. मात्र गोगावलेंची पुन्हा निराशा होणार का, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठ आंदोलक आक्रमक होत असून मोठ्या संख्येने आझाद मैदान परिसरात जमले आहेत. त्यामुळे, सरकारकडून आरक्षण मागणीचा हा तिढा नेमका कसा सुटणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू असून मराठा आरक्षणसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावरही मजेशीर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्रिपदाचाही प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने आहे. यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकाही झाल्या आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. काही दिवसांपूर्वी 15 ऑगस्ट रोजी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना मिळाला होता. त्यावेळीही भरत गोगावले यांनी जाहीरपणे नाराजी उघड केली होती. तर, आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जेव्हा तोडगा निघेल, त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदावरही निघेल, असे म्हणत गोगवले यांनी मिश्कील टिपण्णी केलीय.







