माथेरानकरांच्या प्रवासाला गती
| माथेरान | वार्ताहर |
स्वस्त, सुरक्षित आणि अल्प वेळात नियोजित स्थळ गाठण्यासाठी ई-रिक्षाचा उत्तम पर्याय लाभलेला असल्याने माथेरानकरांकडून तसेच पर्यटकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सद्यःस्थितीत दुसऱ्यांदा ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट सुरू असून, 10 जानेवारीच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षा या येथील हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात, असे निर्देश दिलेले आहेत. परंतु, आजही या सात ई-रिक्षांपैकी नादुरुस्त रिक्षांमुळे कधी पाच ते सहा रिक्षा सुरू असतात. त्यामुळे वेळप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांना, दिव्यांग, रुग्ण, वृद्ध आणि पर्यटकांसाठी उपलब्ध होत नाहीत.
आजच्या घडीला ज्यांनी ज्यांनी ई-रिक्षाला प्रखर विरोध दर्शविला होता. ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गावात ई-रिक्षा येऊ नये यासाठी खोडा घातला होता, तीच मंडळी आणि त्यांचे पाठीराखे प्रामुख्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ई-रिक्षाचा माथेरानकरांनी स्वीकार केलेला असून, ई-रिक्षांची संख्या वाढवून लवकरच त्या हातरिक्षा चालकांना देण्यात याव्यात यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षा आम्हाला देण्यात याव्यात असे सांगितले आहे. परंतु, नगरपालिकेने ठेकेदाराला ई-रिक्षा दिल्याने आजही आमची ससेहोलपट सुरूच आहे. न्यायालयाच्या आदेशाची सनियंत्रण समितीच्या सदस्यांनी अंमलबजावणी करणे गरजेचे असतानादेखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
दीपक डोईफोडे, हातरिक्षा चालक