मी नोव्हेंबरमध्येच मंत्रीपदाचा राजीनामा दिलाः छगन भुजबळ

| नगर | प्रतिनिधी |

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही. पण, त्यांनी सांगितलं माझी शपथ पूर्ण झाली. तुमची शपथ पूर्ण झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल आहे. तर मग सर्व्हेक्षण कशासाठी करत आहात? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच मी 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, असा गौप्यस्फोट करून भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली आहे.

नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांनाच थेट सवाल केला. मला म्हणता भुजबळ राजीनामा द्या. एक आमदार बडबडला भुजबळांना लाथ मारून मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. मला सर्वांना सांगायचं आहे मी राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर रोजीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अंबडच्या सभेला गेलो. तुम्ही त्यांना जाऊन सांगा, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. 17 तारखेला पहिली ओबीसी सभा होती. त्याआधीच राजीनामा दिला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मग उपोषण कशाला करता?
यावेळी त्यांनी अध्यादेशावरून मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली उडवली. तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला. मग आता उपोषण कशाला करत आहात? अध्यादेश आणि मसुदा यातील फरक याला कळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमचा विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका, असं सांगतानाच सर्व्हेक्षण करायला अर्धा तास जातो. अनेक वेळा आकडेवारी वाढवली जाते, खाडाखोड सुरू आहे. आता आरक्षण मिळालं आहे. गुलाल उधळला आहे. मग आता खोटे रेकॉर्ड करायचे काम का सुरू आहे? जामखेड येथे खोटे दाखले दिले जात आहेत. अनेक ठिकाणी खोटे दाखले करायचे काम सुरू आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.
सर्वांना एकत्र राहावं लागेल
सागेसोयरे.. म्हणजे खोटे दाखले द्यायचे काम सुरू आहे. प्रमाणपत्रावर खाडाखोड सुरू आहे, दिशाभूल केली जात आहे. मराठा हे कुणबी झाले तर ओबीसी आरक्षण संपून जाईल. त्यामुळेच सर्वांना एकत्र राहावे लागेल, असं आवाहन त्यांनी केलं.
Exit mobile version